गरमागरम उथळ

सावरकरांनी दिलेल्या साहित्यरुपी गरमागरम चिवड्याचा तुम्ही आस्वाद घेतला असेलच. जर घेतला नसेल तर अवश्य घ्या. चिवडा जसा खमंग असतो आणि त्याची चव जिभेवर तरळत राहते. सावरकरांनी दिलेल्या गरमागरम चिवड्याची चव आजही माझ्या मनात तरळत आहे. असो. तुम्ही गरमागरम उसळ खालली असेलच. पण आज आपण गरमागरम उथळ विषयी चर्चा करणार आहोत. होय, होय उथळ. आजकाल ही उथळ बाजारात उपलब्ध झाली आहे. ती पूर्वी नव्हती असे नव्हे. पण पूर्वी तिची मार्केटिंग करणारे महाभाग आजच्या मानाने कमी होते.
 
मला अनेकदा बलात्काराने ही उथळ खायला घालण्यात आली होती. पण सर्वशक्तीनिशी मी हा डाव हाणून पाडला. एकदा मी विले पार्लेला एका कार्यक्रमात गेलो होतो. विषय होता "मराठी शाळा". मराठी शाळेसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एक सदगृहस्थ मराठी शाळेच्या महतीबद्दल सांगत होते. सांगता सांगता त्यांची जीभ घसरली. ते म्हणाले "इंग्रजी शाळेतली मुले व्यसनांच्या आहारी जातात". मी त्यांना म्हटले "मराठी शाळेतली मुले व्यसन करत नाही का?" यावर ते म्हणाले, "इंग्रजी माध्यमातील मुलांना विषय समजत नाही, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर त्राण पडतो आणि ते व्यसनाधीन होतात". मी पुन्हा म्हटले, "अहो मग मराठी माध्यमातील मुले व्यसन करतात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर मराठीचा त्राण असतो का?" यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हते. ते काहीही अद्वा तदवा बोलू लागले. प्रकरण तिथेच थांबवावे लागले. पण असे उथळ विधान करण्याचे हल्ली टूम निघाले आहे. आपण काय बोलतो? कसे बोलतो? आपला त्या विषयाचा अभ्यास आहे का? आपण संदर्भ तपासले आहेत का? याचा जरा सुद्धा अभ्यास ही मंडळी करत नाही. कोणतेही संशोधन नसताना एकाएकी असे आरोप करणे म्हणजे उथळपणाचा कळस. जसे उथळ विधानं होतात, तसे उथळ समजही होतात बरं का. माझ्या अनेक लेखांमध्ये जे मी लिहिलेच नाही, ते मुद्दे विरोधकांनी काढून दाखवले. तेव्हा मला समजवून सांगावं लागलं आहे की अमूक अमूक शब्द वापरले की त्याचा अर्थ असा असा होतो वगैरे वगैरे. पण समजतील ते उथळवीर कसले? राग आणि द्वेष या दोन वेगळ्या भावना आहेत. हे उथळवीरांना कळत नाही. 
 
सध्या ही गरमागरम उथळ बर्‍याच ठिकाणी मिळते आणि अनेक बडे बडे लोक ही उथळ बनवतात. भापजचे नेते प्रशांत परिचालक याचं उथळ विधान भलतंच गाजलं होतं. आता त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. पण अशा लोकांना हे सुचतंच कसं हा प्रश्न नेहमी मला सतावतो? संजय राऊत साहेबांनी मुंबई निवडणूकीच्या निकाला वेळी आम्ही शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे विधान केले होते आणि नंतर त्यांचाच पचका झाला. कारण नंतर भाजपला ८२ जागा आणि शिवसेनेला ८४ जागा मिळाल्या. राऊत साहेब अशा विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. कॉंग्रेसच्या काळात हे पेटेंट दिगविजय सिंह यांच्याकडे होते. गांधी परिवाराचे युवराज सुद्धा अशा उथळपणात माहीर आहेत. असो. 
 
उद्धव ठाकरे यांना निवडणूक निकालानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की भाजपला ८२ जागा मिळाल्या म्हणजे नोटबंदीचा परिणाम झाला नाही का? तेव्हा उद्धवजींसारख्या जबाबदार व्यक्तीने जे उत्तर दिले ते आश्चर्यकारक होते. ते म्हणाले इतर ठिकाणी भाजप जिंकली नाही हा नोटबंदीचाच परिणाम आहे. म्हणजे उद्धवजींना नेमके काय म्हणायचे होते. नोटबंदी झाली नसती तर भाजपला सगळ्या जागा मिळाल्या असत्या? किंवा शिवसेनेला बाकी ठिकाणी जागा मिळाल्या नाहीत, मग हा कसला परिणाम होता? इतके बडे आणि समाजात मान सन्मान प्राप्त झालेले लोक जेव्हा उथळ विधानं करतात तेव्हा या देशाचं काय होणार हा प्रश्न आपल्याला सतावतो. बारा रुपयात जेवण, पाच रुपायात जेवण असली थट्टा काही कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मी जर चुकत नसेन तर कॉंग्रेस प्रमाणे कुण्या भाजपच्या नेत्यानेही असला पांचटपणा केला होता. नेत्यांच्या उथळ विधानांची यादी जर द्यायला लागलो तर एक स्वतंत्र ग्रंथ बनेल. म्हणून आपण ते टाळूया. कारण या ग्रंथाचं पारायण करण्याचं धाडस माझ्यात तरी नाही. 
 
मुळात आपण ज्या भाषेत लिहितो, बोलतो त्या भाषेचं एक सौंदर्य असतं. मराठी भाषेत तर अनेक बोली भाषा आहेत. वाक्य रचना करताना त्यात वापरलेल्या शब्दांना फार महत्व असतं. मी सह्याद्रीवर एका एपिसोडीक मालिकेचे काही भाग लिहिले होते. एका प्रसंगासाठी मी संवाद लिहिला, तो असा होता "वाईट का होईना, पण तू विनोद केलास". जो सिनियर नट हा संवाद बोलणार होता, त्याला ते जमतच नव्हतं. तो म्हणायचा, "तू चांगला विनोद केलास". दुर्दैवाने मी सेटवर होतो. मी त्यांना समजावून सांगितलं, "सर, वाईट का होईना, पण तू विनोद केलास. या वाक्यात त्याच्या परिस्थितीची भावना व्यक्त झाली आहे. त्याला अनेक अडचणी आहेत म्हणून त्याने बर्‍याच दिवसात विनोद केला नाही, म्हणजे तो हसत खेळत जीवन जगत नाहीये आणि आता त्याने विनोद केला. म्हणून हे पात्र म्हणतं, वाईट का होईना, पण तू विनोद केलास." पण माझ्या समझवण्याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ते सिनियर, त्यांनी "तू चांगला विनोद केलास" असंच म्हटलं. हा सुद्धा एक प्रकारचा उथळपणाच आहे. प्रत्येक लेखकाचे एक वेगळे कौशल्य असते. स्वा. सावरकर उपहासात्मक लिहिताना त्यांच्या लेखणीला बहार यायची. एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन हा लेख वाचण्यासारखा आहे. "काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे" असे सावरकरांनी लिहिले आहे. या लेखावरुन सावरकरांवर पुष्कळ टिका झाली. तेव्हा ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवलं आणि "त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते" असा ठराव मांडला. सावरकरांशी कुणीही शब्दात जिंकू शकलेलं नाही. सावरकर म्हणजे साक्षात भाषाप्रभू. त्यावर तात्याराव म्हणाले "शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता". त्याकाळी असली बुद्धीवादी विधाने वाचायला आणि ऐकायला मिळायची. पण आजकालच्या राजकारण्यांसाठी बुद्धीवाद अस्पृश्य झाला आहे. तात्याराव सावरकर म्हणजे प्रचंड बुद्धीमत्ता. साक्षात सरस्वती आईनेच त्यांना विद्या दिली असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. अत्रे आणि फडक्यांचा वाद तर आपल्याला माहितच आहे. एकदा अत्रे म्हणाले, "फडकेंचं कोणतंही पुस्तक घ्या आणि असं झटका तर त्यातून श्रूंगार रस बाहेर पडेल". अत्रे म्हणजे कमाल माणूस. आज दुर्दैवानं अशी माणसं आपल्यात नाहीत. 
 
सावरकरांच्या सहा सोने पाने या पुस्तकात त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. तेव्हा एका वॉट्सअप ग्रूपवर एका ब्रीगेडी प्रेमी मित्राने सावरकरांनी शिवरायांचा अपमान केला असं म्हटलं. मी त्याला पुरावे द्यायला सांगितले. आज जवळ जवळ दोन वर्षे झाली. तो मित्र अजूनही माझ्या संपर्कात आहे. पण माझ्या प्रिय मित्राने अजूनही पुरावे दिलेले नाही. पुरावे देणे किती सोपे आहे. सहा सोनेरी पाने हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. ते विकत घ्यायचे आणि त्यातील अपमानास्पद मजकूर दाखवायचा. पण उथळवीरांना स्वतःची बुद्धी नसते. ते इतरांच्या दुर्बुद्धीने चालत असतात. सोशल मिडियाचा उदय झाल्यापासून आपण जे फॉरवर्डेड मेसेज पाहतो, ते उधळच असतात. त्या मेसेजला आई-बाप असे कुणीच नसते. ते पोरके असतात, बेघर झाल्या प्रमाणे इथे तिथे फिरत असतात आणि आपण ते फिरवत असतो. या ग्रूपवरुन त्या ग्रूपवर. सांगायचं तात्पर्य या अशा युगात आपण जगतोय. हे उथळवीरांचं युग आहे. या उथळवीरांच्या संगतीमुळे आपल्याकडूनही काही वेळा उथळपणा होतो, हे मान्य करण्यास मला कोणताही उथळपणा वाटत नाही. पण आपण शक्यतो हा उथळपणा टाळावा. आपण भाषेची गोडी जपावी. संदर्भहीन किंवा वायफळ लिहू नये, बोलू नये. कारण उथळपणा हा गरमागरम आणि तिखट वगैरे असला तरी आमचे वैद्य मित्र सांगतात जास्त तिखट खाऊ नये. त्याने बरेच आजार होतात. या तिखट आणि गरमागरम उथळपणामुळे समाजात बैद्धीक आजार बळावत आहे. त्यामुळे आपण तरी हा असला उथळपणा सोडून देऊ. कधी कधी माणसाकडून चुका होतात. परंतु उथळपणा हा स्वभाव होऊ नये. अजून बरेच मुद्दे लिहिवेसे वाटतायत. पण माझा हा लेख उथळ होऊ नये, म्हणून थांबतोय. आता तो उथळ झाला आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार रसिक प्रेक्षकांचाच... 
 
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती