कोल्हापूर : पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले

बुधवार, 26 जुलै 2023 (22:13 IST)
हवामान खात्याने महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
 
आज 26 जुलै रोजी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
 
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
 
पावसाची ही स्थिती अशीच पुणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उद्याही अशीच स्थिती कायम राहाण्याची शक्यता आहे.
 
राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले
 
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी सध्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 40 फूट 5 इंचावर गेली आहे तर पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
 
राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलं आहे. धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यातून 8 हजार 540 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाला स्वयंचलित वक्र आकाराचे सात दरवाजे असून सात पैकी तीन, चार, पाच, सहा आणि सात क्रमांकाचे दरवाजे आज सकाळी उघडले आहेत.
 
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पूर परिस्थिती हाताळण्याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, "कोल्हापूरमध्ये 45 फुटांपर्यंतचे जे क्षेत्र आहे उदा. सुतारवाडा. आणि अशा काही महत्त्वाच्या भागात महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून लोकांना अलर्ट करत आहेत. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी महापालिकेने केली आहे. त्याबाबतची जनजागृती कालपासूनच सुरू करण्यात आली होती.
 
2019 आणि 2021 मध्ये आलेल्या पुराचा लोकांना अनुभव आहे. त्यामुळे लोकांनी योग्य ती तयारी केली आहे आणि ते योग्य ते सहकार्य करत आहेत. कोल्हापूर ग्रामीण आणि करवीर तालुक्यातही याची तयारी झाली आहे. आंबेवाडीसारखं गाव ज्यांच्यावर कायम प्रभाव पडतो, त्या गावात पूर्ण तयारी झाली आहे. त्या गावात निवारागृहाची सोय करण्यात आली आहे."
 
"या सर्व निवारागृहात लोकांच्या नीट राहण्याची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या खाण्यापिण्याची जनावरांची राहण्याची, त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सर्व यंत्रणा सज्ज आहे. लोकांना योग्य माहिती वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि सर्वांचं सहकार्य लाभत आहे."
 
पुढील 24 तास महत्त्वाचे
 
हवामान विभागाचे संचालक के एस होसाळीकर यांनी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढच्या 48 तासात ते अधिक तीव्र होणार असल्याची माहिती मंगळवारी (25 जुलै) ट्वीट करून दिलेली आहे.
 
महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असताना नाशिक जिल्ह्याला मात्र अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी नाशिक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात 62 टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.
 
तळकोकणात जोरदार पाऊस सुरू आहे, सिंधुदुर्गातले तिलारी धरण भरून वाहू लागलं आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. कोल्हापूर-सिंधुदुर्ग महामार्गावर पाणी आल्याने हा रस्ता काहीकाळ बंद करण्यात आला होता.जळगाव जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होत आहे. इथल्या अहिरवाडी क्षेत्रातल्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. इथल्या नागमोडी नदीला पूर आला असून गावात पाणी शिरलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती