आता साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (10:26 IST)
राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे.
 
ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. याचा अर्थ अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत ६ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. कमी वयात शाळा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 
 
शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. प्रवेशासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना हाती घेण्यासाठी याचसंदर्भात शिक्षण संचालकांची (प्राथमिक) एक सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती. नियुक्त समितीच्या शिफारशीनुसारच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती