शेतकऱ्यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही - धनंजय मुंडे

सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (09:31 IST)
राज्यात यावर्षी १९७२ सालापेक्षाही भीषण #दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत देण्याची गरज आहे. ही मदत अधिवेशनापूर्वी न दिल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. धनंजय मुंडे हे मागील ४ दिवसांपासून दुष्काळी भागाचा दौरा करत गावकऱ्यांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर व पट्टीवडगाव सर्कलमधील ४२ पेक्षा जास्त गावांमधील नागरिक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
 
२०१३ मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी तत्कालीन आघाडी सरकारने हेक्टरी २५ हजार रूपये मदत दिली होती. यंदा अधिक बिकट परिस्थिती असल्याने यावेळी ५० हजार रूपये हेक्टरी मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. मागच्या वर्षीचे बोंडअळीची नुकसानभरपाई, वीजबील माफ, १०० टक्के कर्जमाफीची अमलबजावणी आणि मागेल तिथे टँकर, दावणीला चारा आदी मागण्याही त्यांनी केल्या. बीड जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैशांवर व्याज खात आहे. त्यांची ही कृती म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचीही टीका मुंडे यांनी केली.
 
यावेळी ज्येष्ठ नेते किसनराव बावणे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, माऊली जाधव, शिवहार भताने, बाळासाहेब देशमुख, तानाजी देशमुख, गणेश देशमुख, मच्छिंद्र वालेकर, मुस्ताक पटेल, पांडुतात्या हारे, शिवाजीराव सिरसाट, बळवंतराव बावणे, बालासाहेब राजमाने, गंडले साहेब, चंद्रकांत वाकडे, विश्वंभर फड, सत्यजित सिरसाठ, धनंजय शिंदे, चंद्रकांत चाटे, काशिनाथ कातकडे व परिसरातील सर्व सरपंच, घाटनांदुर येथील ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व नागरिक आदी उपस्थित होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती