कोरोनामुळे यंदा भवानीज्योत घेऊन जाण्यास प्रतिबंध

शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)
साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ अशी ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपूर्वी राज्यभरातील शेकडो नवरात्रोत्सव मंडळ भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात. हलग्यांचा कडकडाट, कुंकवाची मुक्त उधळण आणि आई राजा उदोउदोचा गगनभेदी गजर अशा भक्तीमय वातावरणात हजारो तरुण तुळजापुरातून आपापल्या गावी भवानीज्योत घेऊन जातात. कोरोनाचा वाढता कहर पाहाता यंदा भवानीज्योत घेऊन जाण्यासाठी येणाऱ्या नवरात्रोत्सव मंडळांवर  प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
 
घटस्थापनेनंतर उस्मानाबाद, लातूर आणि परिसरातील जिल्ह्यंसह आंध्र आणि कर्नाटकातून घटस्थापनेनंतरही जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोजागरी पौर्णिमेच्या उत्सवाला शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातून देखील हजारो भाविक तुळजापूरला पायी चालत येतात. जगदंबेला खेटा घालण्यासाठी मोठय़ा श्रध्देने चालत येणाऱ्या भाविकांना यंदा खेटा घालता येणार नाही. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने पायी येणाऱ्या भाविकांना तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जाहीर केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती