सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसचा अजूनही गोंधळ, तर 5 दिवसांचे कपडे, आधारकार्ड, पॅनकार्ड घेवून येण्याचे आदेश

बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (15:21 IST)
राज्यातील सत्ता स्थापनेचा खेळ आता दिवसेंदिवस रटाळ होतांना दिसत आहे. यातच राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने सर्व कारभार आता राज्यपाल पाहत आहेत. तर शिवसेने सोबत सत्ता स्थापना करायची की नाही याबद्दल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे पक्ष चालढकल करतांना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेचा पेच अजूनही कायम आहे. आता त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यावेळी आमदारांना नव्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक आमदाराला आपल्या सोबत 5 दिवसांचे कपडे, आधारकार्ड आणि पॅनकार्ड ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा  सुरु आहे.
 
सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी 22 नोव्हेंबर पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा अज्ञात ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. म्हणूनच तर या सर्व आमदारांना 5 दिवसांचे कपडे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत आणण्यास सांगितले आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर आमदारांची ओळख परेड होत असताना काहीही अडचण येऊन नये म्हणून असं केलं जात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
 
भाजपपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यात अद्यापही कोणताही  ठोस निर्णय झालेला नाही. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती