छत्रपती संभाजीनगर :तलावात बुडून चार मुलांचा मृत्यू

शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (09:34 IST)
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), जावेद शेख (वय 14 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहे.
 
अधिक माहितीनुसार, संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलं पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. तसेच याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर या मुलांचा मृतदेह शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
 
11 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते. मात्र, सायंकाळ होऊन देखील ते परतले नाही. मुलं घरी का परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांच शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले.
 
त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या शोधकार्यानंतर मुलांचा मृतदेह मिळून आले. मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती