एक हजाराची लाच घेतल्याप्रकरणी कृषी सहाय्यकास सात वर्षे कारावास

शुक्रवार, 5 एप्रिल 2024 (09:30 IST)
धाराशिव – शाळा सोडल्याचा मूळ दाखला व इयत्ता 10 वी चा मूळ मार्कमेमो देण्यासाठी एक हजाराची लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यामुळे कुंभारी ( ता. तुळजापूर ) येथील लक्ष्मीबाई बाबुराव पाटील कृषी तंत्रनिकेतनमधील कृषी सहाय्यक अशोक दल्लू राठोड यांना सात वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
तक्रारदार यांना त्यांचा शाळा सोडल्याचा मूळ दाखला व इयत्ता 10 वी चा मूळ मार्कमेमो देण्यासाठी यातील आलोसे यांनी 1000 रु. मागणी करून पंचा समक्ष स्वीकारल्या प्रकरणी कुंभारी ( ता. तुळजापूर ) येथील लक्ष्मीबाई बाबुराव पाटील कृषी तंत्रनिकेतनमधील कृषी सहाय्यक अशोक दल्लू राठोड यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये सन २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक असिफ बी. शेख यांनी सापळा रचून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
 
तब्बल ९ वर्षांनी हा खटल्याचा निकाल लागला आहे. सरकारची बाजू शासकीय अभियोक्ता पी. के. जाधव यांनी मांडली. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात चालला आणि लाचखोर कृषी सहाय्यक अशोक दल्लू राठोड यांना कलम 7 अन्वये 3 वर्ष कारावास व 5000 रु दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास कलम 13(2) अन्वये 4 वर्ष कारावास व 5000 रु दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती