सुशांत सिंह राजपूत प्रकरण, कोर्टाने निकाल राखून ठेवला

बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (08:16 IST)
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध बिहारमध्ये दाखल करण्यात आलेला एफआयआर मुंबईत हस्तांतरीत करावा म्हणून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने निकाल राखून ठेवला. या प्रकरणातील रियाचे वकील, सुशांतच्या कुटुंबाचे वकील, महाराष्ट्र राज्याचे वकील, बिहार राज्याचे वकील आणि भारताच्या सॉलिसिटर जनरल यांना सविस्तर लेखी जबाब येत्या गुरुवारपर्यंत कोर्टात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. 
 
अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे मयत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर प्रेम होते. मात्र, आता तिलाच बळी दिले जात आहे, असा युक्तिवाद रियाच्या वकिलांनी केला. तर बिहारमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरू असल्याचा दावा महाराष्ट्र सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. आयपीएस अधिकार्‍याला क्वारंटाईन केल्याचा मुद्दा यावेळी बिहार सरकारने सुप्रीम कोर्टात उचलून धरला.
 
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दाखल केलेली एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करावी आणि बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाला स्थगिती द्यावी, यासाठी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हृषीकेश रॉय यांच्या एकल खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत त्याच्या वडिलांनी बिहारमध्ये तक्रार दाखल केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती