बिहारमध्ये वीज कोसळून ११० ठार

शुक्रवार, 26 जून 2020 (08:35 IST)
बिहारमध्ये गुरुवारी ठिकठिकाणी वीज कोसळून 110 जण मरण पावल्याची दुर्घटना घडली. राज्यभर गुरुवारी विजांनी कहर केला. मृतांमध्ये गोपाळगंजचे 14, सिवान 6, दरभंगा 5, मोतिहारी 3, मधुबनी 8, नवादा 8, तर बेतियातील दोघांचा समावेश आहे.
 
भागलपूर जिल्ह्यातही 7 जण मरण पावले आहेत. शिवाय, सीवानच्या भगवानपूर आणि अरुआ गावांत वीज कोसळल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पूर्व चंपारण्यमध्ये तसेच बांका जिल्ह्यात प्रत्येकी 5 जण मरण पावले आहेत. खगडिया आणि औरंगाबादमध्ये (बिहार) प्रत्येकी 3, पश्‍चिम चंपारण्य, किशनगंज, जहानाबाद, जमुई, पूर्णिया, सुपौल, कैमूर व बक्सर में 2-2 जण मरण पावले आहेत. समस्तीपूर, शिवहर, सारण, सीतामढी आणि मधेपुरात प्रत्येकी एकजण मरण पावला आहे. गोपाळगंजच्या उचका गावात शेतात काम करत असलेले 7 जण मरण पावले. शिवाय, बरौलीत 2,  सोनबरसा आणि खजुरियात प्रत्येकी 1 जण मरण पावला. अनेक जखमींपैकी 6 जण अत्यवस्थ आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी बिहारच्या 23 जिल्ह्यांतून रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. पूर्व चंपारण्य, प. चंपारण्य, गोपाळगंज, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, सहरसा व मधेपुराचा त्यात समावेश आहे. कटिहार, भागलपूर, बांका, मुंगेर, खगडिया आणि जमुईत मुसळधार पाऊस होईल, असाही अंदाज आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या घटनेवर शोक व्यक्‍त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती