18 में (सोमवार)पासून 50 टक्के सरकारी कर्मचारी कामावर रुजू होण्याचे केंद्र सरकारचे आदेश

शनिवार, 16 मे 2020 (07:22 IST)
सोमवार 18 मे पासून 50 टक्के कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत रुजू होण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सहाय्यक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना कामावर हजर राहण्याचे या आदेशात केंद्राने स्पष्ट केले आहे. शनिवारपासून टप्प्याटप्याने कामकाजाला सुरुवात होणार आहे.

देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. देशात घेण्यात आलेला तिसरा लॉकडाऊन 17 मे ला संपणार आहे. त्यानंतर 18 मे पासून चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 18 मे पासून शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर 50 टक्के कर्मचाऱ्यांनी रोटेशनप्रमाणे काम करायला सुरुवात करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांची शनिवारची सुट्टी लॉकडाऊन असल्याने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील जी शासकीय कार्यालये आहेत ती केंद्र सरकारची असोत किंवा राज्य सरकारची त्यामध्ये 50 टक्के कर्मचारी 18 मे पासून उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, या आधी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता त्यामध्ये 15 टक्के कर्मचारी खास करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना काम करण्याची मुभा देण्यात आली होती. कामाला सुरवात करण्याआधी थर्मल स्क्रीनिंग आणि गाडीचे सॅनिटायझिंग केले जात होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सोशल डिस्टेंसिंग ठेवत 18 मे पासून कामकाजाला सुरवात करावी असे आदेश केंद्राने आज दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती