एक डाव नियतीचा?

बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (14:35 IST)
मिसेस खन्नाचा चेहरा पडला होता. काय करावं हे त्यांना सुचतंच नव्हतं. सगळं मानसिक बळ एकवटून सरळ जाऊन मिस्टर बॅनर्जीच्या घरी जायचं आणि त्यांना जाब विचारायचा असा विचार तिच्या मनात आला. पण आपण बाई माणूस. काही विपरित घडलं तर? मिस्टर बॅनर्जींच्या घरी घातपात झाला तर? मिस्टर बॅनर्जी धष्टपुष्ट आणि रांगडा माणूस. त्याच्यासरमोर आपलं काहीच चालणार नाही. अंगावरुन एखादी मुंगी झटकावी तसा झटकून देईल तो आपल्याला. म्हणून मनात असूनही ती गप्प राहिली. पोलिसांना कळवावं असंही एकदा मनात येऊन गेलं. पण कसलीच खात्री नसताना पोलिसांना त्रास देणं योग्य नव्हतं. त्यात आपण काही सिद्ध करु शकलो नाही तर पोलिस आपल्यावरच उलटायचे आणि वर बॅनर्जी अब्रूनुकसानीचा दावा ठोकायचा. म्हणून तिने जरा सबुरीने घ्यायचं ठरवलं. आपला नवरा आला की त्यालाच सगळी हकीकत सांगू. तोवर फक्त पाहत बसायचं. तिने खिडकीचा पडदा हळूच बाजूला केला आणि रस्त्यापलीकडील असलेल्या मिस्टर बॅनर्जीच्या घराकडे पाहू लागली. कोणतीच हालचाल दिसत नव्हती. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी पर्यटक सोडले की लोकांची तशी रेलचेल नसते. त्यामुळे आपल्याला हवा तो डाव खेळता येतो... अगदी निवांतपणे.... तुम्ही कुणाचाही काटा अगदी सहज काढू शकता... आता पावसाळा सुरु झाल्यामुळे पर्यटकही नव्हते आणि ते जिथे राहत होते ते ठिकाण पर्यटन स्थळापासून दूर होते. 
 
मिसेस खन्ना वि़चारात मग्न असतानाच दाराची बेल वाजली. तिची समाधी भंग झाली. पण चेहर्‍यावर हलकासा आनंद दिसू लागला. तिने दार उघडले तर दारात मिस्टर खन्ना उभा होता. रोजच्याप्रमाणे तिने हसत त्याचे स्वागत केले. तो हॉलमध्ये सोफ्यावर बसला. तिने पाणी आणून दिले आणि त्याच्याकडे आशेने पाहू लागली. 
 
मिस्टर खन्नाने ओळखले की आपल्या पत्नीला आपल्याकडून काहीतरी हवे आहे. ’काही हवंय का?’ मिस्टर खन्नांनी विचारताच मिसेस खन्ना म्हणाली ’तसं काही नाही. पण मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला’. ’हे बघ, तुला जर एखादा नेल्केस वगैरे हवा असेल तर तुला दोन महिने तरी थांबावं लागेल. पावसाळ्यात व्यवसाय मंद असतो. हॉटेल्स ओसाड पडलेली असतात आणि’... तो पुढे बोलणार इतक्यात तिने त्याला रोखलं ’मला नेक्लेस नकोय.’ ’अरे व्वा... ही तर आनंदवार्ता आहे. पण तुला हवं तरी काय? अच्छा आज रोमॅंटिक वगैरे...’ ’ऐकून तरी घ्याल का माझं?’ ती थोड्याशा नाराजीच्या स्वरात म्हणाली. ’मला जरा वेगळ्याच विषयावर बोलायचंय’ मिस्टर खन्नाने ओळखलं की तिला काहीतरी विशेष सांगायचं आहे. ’मला चार दिवसांपासून ब्रिंजल दिसली नाही आणि मिस्टर बॅनर्जी म्हणे हे घर सोडून जातायत.’ मिस्टर खन्नाने वैचारिक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला ’मग? यात काय विशेष?’. ’तुम्हाला कळत कसं नाही. मला संशय येतोय. मिस्टर बॅनर्जीने तिला काहीतरी केलं असेल तर?’.
 
मिस्टर खन्नाचा चेहरा गंभीर झाला. पण दुसर्‍याच क्षणी तिची थट्टा करत म्हणाला ’तू डिटेक्टिव्हगिरी कधी पासून सुरु केलीस? तसंही तुम्हा बायकांना दुसर्‍यांच्या घरात डोकावून बघण्याची फारच वाईट सवय...’ ’हे बघा, ही काही थट्टा मस्करी करायची वेळ नाही. मी खूप सिरीयस आहे. ब्रिंजल नाहीशी झालीय आणि तिला नाहीशी करुन हा माणूस आता पसार होणार आहे.’ मिस्टर खन्ना समजवण्याच्या सुरात म्हणाला ’मी कालच मिस्टर बॅनर्जींना भेटलो होतो. सहज रस्त्यात भेट झाली. त्यांचं हॉटेल व्यवस्थित चालत नाही. म्हणून ते हॉटेल विकून मुंबईला रेस्तरॉं सुरु करणार आहेत असं म्हणत होते. ही अगदी साधी बाब आहे. तू उगीच टेन्शन घेतेयस.’ ’अच्छा... मग ब्रिंजल कुठे गेलीय?’ 
 
’अगं हा त्या नवारा बायकोंमधला प्रश्न आहे. आपण मध्ये आगाऊपणा का करायचा. माझा मूड आज खूप चांगला आहे. मी आता फ्रेश होतो आणि व्हिस्कीचे दोन पेग मारत मॅच बघणार आहे. सो... मला डिस्टर्ब करु नकोस प्लीज’ असं म्हणत तो बेडरुममध्ये निघून गेला. पण मिसेस खन्नाला मात्र नवर्‍याचं हे वागणं आवडलं नव्हतं. कारण, समजा जर खरोखरच मिस्टर बॅनर्जीने ब्रिंजलला म्हणजे त्याच्या बायकोला मारलं असेल तर? तर हा खूनी मोकाट सुटणार होता. तो मुंबईला जातोय की हा देश सोडून जातोय कुणास ठाऊक. एकदा का देशाबाहेर पसार झाला तर कोण याच्या मागावर जाईल? तसंही ब्रिंजलसारख्या सामान्य स्त्रीच्या जीवाची किंमत ती काय? मल्या सारखा माणूस करोडो रुपये खाऊन पळून जातो. त्याचा अजून पत्ता नाही... आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. पण आपण काय करणार? त्यापेक्षा आपल्या नवर्‍यालाच पटवूया. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है. म्हणजे काही झालं तरी आपला नवरा एक पुरुष... मॅच आणि व्हिस्की कितीही महत्वाची असली तरी आपल्या सौंदर्यापुढे त्याचं काही चालणार नाही. तिने आपलं सौंदर्यशस्त्र वापरण्याचं ठरवलं. 
 
खन्ना बाथरुममध्ये शॉवर घेत होता. तिने बाथरुमचा दार ठोठावला, त्याने दार उघडताच आपला गाऊन शरीरापासून झटदिशी बाजूला करुन ती बाथरुममध्ये शिरली. त्याने कित्येक वेळ तिच्या सौंदर्याचा उपभोग घेतला होता. ती ३२ वर्षांची होती. पण तिचा बांधा एखाद्या १८ वर्षांच्या नवतरुणीला लाजवेल असा होता. तिचे उरोज अजूनही टवटवीत होते. चांगली गोरीपान होती... तिच्या त्या सौंदर्यासाठी जगातला कोणताही पुरुष कोणतेही पाप करायला तयार झाला असता, इतकं तिचं सौंदर्य अफाट होतं... ती अचानक बाथरुममध्ये शिरली हे त्याच्यासाठी सरप्राईज होतं. शेवटी पुरुषाची जात. स्त्रीचं निर्वस्त्र शरीर पाहून तो पाघळलाच. दिवसभराचा आपला सगळा त्राण त्याने तिच्या योनीत विसर्जीत केला. 
 
तिनेच त्याला मॅच लावून दिली आणि व्हीस्कीचा पेगही बनवून दिला. दोघेही सोफ्यावर बसले. आता तिचं ऐकण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरला नव्हता. तिने त्याला समजवून सांगितलं की कशाप्रकारे ब्रिंजल आणि मिस्टर बॅनर्जी यांचं पटत नव्हतं. ते सारखे भांडायचे. तिच्यापासून सुटका मिळवण्यसाठीच त्याने तिचा काटा काढला असणार. मिस्टर खन्नाला तिचं बोलणं अगदीच पटलं नाही असं नव्हे. पण लगेच खून वगैरे या निष्कर्षापर्यंत जाणं त्याला मान्य नव्हतं. तरी बायकोने सांगितलं म्हणून मिस्टर बॅनर्जीच्या घरी जाऊन चौकशी वजा विचारपूस करण्याचं त्याने मान्य केलं. तो मुकाट्याने उठला आणि त्याने बॅनर्जीच्या दाराची बेल वाजवली. दोन तीनदा बेल वाजवल्यावर बॅनर्जीने दार उघडलं. खन्नाला पाहून त्याला आनंद झाल्यासारखा चेहरा त्याने केला. ’मिस्टर खन्ना... या... या... आत या... व्हिस्कीचे दोन पेग मारुया...’ दोघेही आत गेले. बॅनर्जीने त्याचं उत्तम स्वागत केलं. खन्ना आणि बॅनर्जी कधीतरी ड्रिंक्स घ्यायला भेटायचे. दोघेही हॉटेलचे मालक. खन्नाचं हॅटेल फायद्यात चाललं होतं तर बॅनर्जीचं तोट्यात. बॅनर्जी जवळ जवळ सहा फुट उंच तर खन्ना ५.४ एवढ्या सामान्य उंचीचा माणूस, दिसायलाही सामान्य. पण बॅनर्जी चांगला गोरापान होता. बॅनर्जीचा स्वभावही रांगडा, मोठ्याने बोलायचा आणि खन्ना अगदी नम्रपणे वागायचा. दोघांच्या स्वभावात इतका फरक होता. मॅच चांगलीच रंगात आली होती. इंडियाची बॅटिंग होती आणि विराट कोहली भलत्याच फॉर्ममध्ये होता. मॅच बघता बघता मध्येच खन्नाने प्रश्न विचारला ’मिसेस बॅनर्जी कुठे दिसत नाहीत? संध्या म्हणत होती की गेले चार पाच दिवस त्या दोघी भेटल्या सुद्धा नाहीत.’
 
’ओह्ह... काही विचारु नका मिस्टर खन्ना, तुम्हाला तर माहितीय, आमचं पटत नाही. चार दिवसांपूर्वीच धाडधाड पावलं आपटत ती माहेरी निघून गेली. तिने फोन सुद्धा नेला नाही. पण डोन्ट वॉरी... मी मनवीन तिला. कसंय ना मिस्टर खन्ना. माझा स्वभाव कसाही असला तरी माझं प्रेम आहे ब्रिंजलवर. पण काय करु, हल्ली मला राग जरा जास्तच येतो आणि रागाच्या भरात काय करेन याचाही पत्ता लागत नाही मला. त्या दिवशी मी तिच्यावर हात उचलला म्हणून ती चिडली आणि निघून गेली. बट आय टेल यू, तिचंही माझ्यावर खूप प्रेम आहे.’ मिस्टर बॅनर्जी बर्‍यापैकी झिंगला होता... आपल्या बायकोची तोंडभरुन स्तुती करत होता. खन्नाला शंका आली. पण घरात संशयास्पद असं काहीच जाणवत नव्हतं. बॅनर्जीसोबत मॅचची एक इनिंग खन्नाने बघितली. त्याच्याकडून जमेल ती माहिती काढली आणि बायको वाट बघत असेल हे कारण देऊन खन्ना तिथून सटकला. 
 
घरी येऊन सगळी हकीकत त्याने आपल्या बायकोला सांगितली. पण तिची पूर्ण खात्री बसली नाही. तिला अजूनही शंका होती की ब्रिंजलच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलं आहे. दोन दिवस तिची शोध मोहिम सुरुच होती. अखेर दोन दिवसांनी मिस्टर बॅनर्जीने खन्ना कुटुंबाचा निरोप घेतला आणि तो मुंबईच्या दिशेने रवाना झाला. मिसेस खन्ना फारच उदास झाली. आपली एक चांगली मैत्रीण आपल्यापासून दुरावली. पण तिला वाचवण्यासाठी आपण काहीच करु शकलो नाही ही खंत तिला सतावत होती. खन्नाच्या बंगल्याच्या आजूबाजूला अजूनही काही बंगले होते. पण बंगल्याचे मालक मुंबई, पुणे, विदेश अशा इतर ठिकाणी राहत होते. कधीतरी ते महाबळेश्वरला यायचे. गेल्या दोन वर्षांपासून बॅनर्जी तिथे राहायला आला होता. ब्रिंजल आणि संध्याची चांगलीच मैत्री झाली होती. त्या एकमेकांशी सगळंच शेअर करत होत्या. ब्रिंजलने बोलता बोलता आपल्या नवर्‍याच्या विचित्र स्वभावाबद्दल अनेकदा सांगितलं होतं. पण आता विचार करुन काय उपयोग होणार होता? ब्रिंजल कदाचित या जगातून निघून गेली होती आणि तिचा मारेकरी तिचा नवरा पसार झाला होता...
 
बॅनर्जीला निरोप देऊन खन्ना हॉटेलमध्ये निघून गेला... ती दिवसभर एकटीच घरी असायची. कामे आटोपली की ब्रिंजलसोबत गप्पा आणि जवळपास फेरफटका हा तिचा दिनक्रम ठरला होता. कधी कधी नवर्‍याच्या हॉटेलवर सुद्धा एक चक्कर असायची. ती विचारात मग्न होती. नेहमीप्रमाणे तिने पारोशी कपडे वॉशिंगमशीनमध्ये टाकले. वॅशिंगमशीन ऑन केली आणि अचानक काहीतरी झालं... ती स्तब्ध झाली... तिला काहीच सुचेना, उमगेना... एका पुतळ्यासारखी निर्जीव उभी राहिली. ओरडावस वाटलं, पण तेवढाही त्राण तिच्यात नव्हता आणि अचानक ती खाली कोसळली. खन्ना संध्याकाळी जेव्हा घरी आला तेव्हा त्याला तिच्या बायकोचं प्रेत सापडलं. विजेचा झटका लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. 
 
पोलिस आले, पोस्टमॉटर्म झालं. विजेचा झटका लागल्यामुळे मृत्यू झाल्याचं सिद्ध झालं. काही दिवसांनंतर मिस्टर खन्ना एकटाच आपल्या घरात बसला असताना अचानक फोनची रिंग वाजली. समोरुन गोड आवाज ऐकू आला, ’हॅलो... संध्या आहे का? मी ब्रिंजल बोलतेय.’ खन्ना अगदीच दुःखी आवाजात म्हणाला, ’नाही, ती नाहिये... मुळात ती कधीच येणार नाहीये..’ समोरुन पुन्हा तो गोड आवाज ऐकू आला, ’मला काहीच कळत नाहीये मिस्टर खन्ना तुम्ही काय बोलताय ते? बरं संध्या आली की तिला माझा निरोप द्या. माझा फोन इतकी दिवस बंद होता म्हणून आमचा संपर्क झाला नाही. अता मजहा फोन चालू आहे. मी रागातच माहेरी निघून गेले होते. पण सुजॉजने मला मनवलंच. बरं मी हे सांगण्यासाठी फोन केला होता की पुढल्या महिन्याच्या २७ तारखेला आमच्या नवीन रेस्तरॉंचं ओपनिंग आहे इथे मुंबईत. तर तुम्ही संध्याला घेऊन नक्कीच या...’
 
ब्रिंजलने मिस्टर खन्नाला बोलूच दिलं नाही. पण शेवटी मनावर दगड ठेवून ते पाच कठोर शब्द त्याने उच्चारलेच, ’संध्या या जगात राहिली नाही...’ ब्रिंजलला धक्काच बसला होता. आपली मैत्रीण आपल्याला सोडून या जगातून निघून गेली. तिने सुजॉयला म्हणजेच मिस्टर बॅनर्जीला सगळी हकीकत सांगितली आणि म्हणाली, ’माझा मिस्टर खन्नावर संशय आहे. त्यानेच तिला ठार मारलं असणार... तसंही त्याने तिच्या इस्टेटीखातर तिच्याशी लग्न केलं होतं. तिच्याशी लग्न केल्यावरच एवढ्या मोठ्या हॉटेलचा मालक झाला होता तो हरामखोर... आता तिचा खून करुन तो अपघात आहे हे त्याने व्यवस्थित सिद्ध केलंय सुजॉय... आपल्याला काहीतरी केलं पाहिजे...’ 
 
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती