Kids Story : हुषार वानर

एका‍गावात समुद्रकिनार्‍याजवळ जांभळाचे झाड होते. त्या झाडावर रक्तमुख नांवाचा वानर रहात होता. ऐक दिवशी एक मगर समुद्रातून येऊन त्या जांभळाच्या जाडाखाली ऊन खात पडला होता. त्याला पाहून झाडावरची जांभळे मगराकडे टाकत रक्तमुख वानर म्हणतो, ''तू माझा पाहुणा आहेस. तेव्हा आदरातिथ्य केलंच पाहिजे.''
 
मगराने ती जांभळे खाल्ली. नंतर गप्पागोष्टी झाल्यावर मगर समुद्रात निघून गेला. त्यानंतर रोजच मगर येऊ लागला. त्या मगराला रोज जांभळे रक्तमुख देऊ लागला. काहीवेळा उरलेली जांभळे घेऊन मगर आपल्या बायकोसाठी घेऊन जाई. एके दिवशी मगरीने मगरास विचारलं की तुमच्या मित्राकडून ही अमृतासारखी फळे घेऊन येता. जर त्या मित्राचे काळीज ही फळे खाऊन खाऊन अमृतासारखं झालं असेल! तेव्हा त्या मित्राचे काळीज मला घेऊन याच!
 
मगरीचे बोल ऐकून मगर सांगतो, ''छे! छे! हे भलतंच काय बोलतेस? रक्तमुख वानर माझा जिवलग मित्र बनला आहे. त्याला मारणं माझ्याकडून होणार नाही!''
 
तेव्हा मगरीचे आणि मगराचे खूप वादावादी होते. नंतर मगरी निक्षून सांगते की, ''मला जर ते काळीज आणून दिलं नाहीत तर मी उपास करून जीव देईन.''
 
मगरीचे निकराचे बोलणे ऐकूण मगर दु:खी मनाने वानराचे काळीज आणण्यास निघतो. रक्तमुख मगराची वाट बघतच असतो. मगराचा दु:खी चेहरा बघून रक्तमुख विचारतो, ''काय रे... आज तुझा चेहरा दु:खी का?''
 
त्यावर मगर उद्‍गारतो, ''आज माझ्या बायकोने माझी खरडपट्टी काढली की मित्र एवढी जांभळे रोज देतो पण त्याला आपल्या घरी का नाही बोलवत?'' रक्तमुख उत्तरतो, ''अरे, पण मी समुद्रातल्या तुझ्या घरी येणार कसा? ''मी जमिनीवरचा प्राणी...! '' ''समुद्रात मध्यभागी वाळवंट आहे त्यात माझं घर आहे. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला तिथं नेईन या मगराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वानर त्याच्या पाठीवर बसतो.
 
समुद्राच्या मध्यभागी आल्यावर समुद्राच्या लाटांचा मारा वानराला सहन होईना. तेव्हा तो मगराला हळू जाण्यास सांगतो. तेव्हा मगर विचार करतो की आपण आपला हेतू वानराला सांगण्यास हरकत नाही. वानर पळून जाऊ शकत नाही. मगर रक्तमुख वानराला सांगतो, ''‍‍मित्रा, देवाचं नाव घे.मी तुला फसवून इथं आणलंय! कारण माझ्या बायकोला तुझं काळीज खायची तीव्र इच्छा झाली आहे.''
 
मगराचे बोलणे ऐकून वानर घाबरतो. पण तसे न दाखवता मगरास बोलतो, ''हात्तिच्या, एवढचं ना? ... अरे पण मी माझं काळीज जांभळाच्या ढोलीत ठेवतो. आधीच बोलला असतास तर किनार्‍यावरच देता आलं असतं!''
 
मगर त्यावर उत्तरतो, ''माझाच गाढवपणा झाला. आपण परत जाऊ किनार्‍यावर!'' वानराला मगराने किनार्‍यावर आणून सोडल्यावर वानर एका मोठ्या उडीत जांभळाचा शेंडा गाठतो. आणि मगराला सांगतो ''विश्वासघातकी मित्रा चालता हो इथून! नशीब माझं म्हणूनच वाचलो तुझ्या तावडीतून! काळजी थोडंच बाजूला काढता येतं का?''
 
मगराला आता पश्चात्ताप होतो की आपला हेतू आपण उगाचच आधी सांगितला. मगर पुन्हा वानराला सांगतो की, तुझी गम्मत केली. मी तुला मारणार नव्हतो.'' पण वानर सांगतो. ''तुझ्या विश्वासघाती स्वभावाचा एकदा अनुभव आल्यावर तुझ्या शब्दांवर माझा विश्वासच नाही. तू इथून तुझे तोंड काळे कर!
 
तात्पर्य : संकटाला न डगमगता धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांनां दूर ठेवले पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा