तेनालीराम कथा - अनमोल फुलदाणी

मंगळवार, 5 जानेवारी 2021 (12:52 IST)
विजय नगराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात होता. या मध्ये जवळच्या राज्याचे राजे देखील सामील होऊन महाराजांसाठी काही न काही भेट वस्तू आणायचे. दर वर्षी प्रमाणे यंदा देखील महाराजांसाठी मौल्यवान भेटवस्तू आल्या होत्या. सर्व भेटवस्तूंमधे त्यांना चार रत्नजडित फुलदाण्या खूपच आवडल्या होत्या. महाराजांनी त्या चार ही फुलदाण्या आपल्या कक्षात ठेवल्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी एक सेवक नेमला. त्याचे नाव रमैया होते.

रमैया खूप लक्ष ठेवून त्या फुलदाण्यांची काळजी घेत होता कारण त्याला महाराजांनी आधीच त्या फुलदाण्यांची काळजी घेण्याचे सांगितले होते. त्या फुलदाण्यांचे काहीही नुकसान झाले तर तुला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल अशी ताकीद महाराजांनी रमैयाला दिली होती. म्हणून तो त्या फुलदाण्यांची विशेष काळजी घेत होता. एके दिवशी रमैया त्या फुलदाण्याला स्वच्छ करताना त्याचा हातून एक फुलदाणी पडते आणि फुटते. महाराजांना हे कळतातच ते त्याला फाशीची शिक्षा देतात. 

त्याला अवघ्या 4 दिवसानंतर फाश्यावर टांगण्यात येणार होते. तेनालीराम महाराजांकडे येतात आणि त्यांना त्यांच्या या निर्णयाबद्दल म्हणतात की - महाराज हे चुकीचे आहे, निव्वळ एका फुलदाणीसाठी आपण कोणाला शिक्षा कसे देऊ शकता? हे अन्याय आहे. त्या वेळी महाराज संतापले होते म्हणून त्यांनी तेनालीरामच्या गोष्टीचे उत्तर देणे योग्य समजले नाही. 
 
तेनालीराम नंतर रमैया कडे गेले आणि त्याला म्हणाले की - 'आपण काळजी करू नका मी जसे सांगेन आपण तसेच करा. माझ्यावर विश्वास ठेवा मी आपल्याला काहीच होऊ देणार नाही. रमैया ने होकार दिला. रमैयाला फाश्यावर देण्याचा दिवस आला. महाराज देखील त्या ठिकाणी होते त्यांनी रमैयाला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा त्याने शेवटची इच्छा म्हणून ते तिन्ही फुलदाण्या मागविल्या ज्यांच्या मुळे त्याला फाश्यावर लटकविण्यात येत होते. रमैयाच्या इच्छांनुसार महाराजांनी तिन्ही फुलदाण्या मागविल्या. त्या फुलदाण्या समोर येताच रमैयाने त्या तिन्ही फुलदाण्या तेनालीरामच्या सांगण्यानुसार जमिनीवर आपटून तोडल्या. 
 
रमैयाच्या अशा वागणुकीवर महाराज फार चिडले आणि ओरडले 'अरे मूर्ख माणसा हे काय केले ? का बरं हे तोडले? 
त्यावर रमैया म्हणाला - 'महाराज मी एक फुलदाणी तोडली म्हणून आपण मला फाश्यावर देत आहात पण मी मेल्यावर जर अजून कोणाच्या हातून या फुलदाण्या तुटल्या तर अजून तीन लोकांचे जीव जाऊ नये म्हणून मी हे तोडले. आणि त्या तीन लोकांचे प्राण वाचवले. 
रमैया चे म्हणणे ऐकून महाराज शांत झाले आणि त्याला विचारले की कोणाच्या सांगण्यावरुन तू असे केलेस ? रमैया ने त्यांना सर्व सांगितले की तेनालीरामने असे करण्यासाठी सांगितले तेव्हा महाराजांनी तेनालीरामला जवळ बोलवून त्यांना म्हणाले की - 'तेनालीराम आज आपल्यामुळे एक निर्दोषाचे प्राण वाचले आणि आपण आम्हाला शिकवणी दिली की नेहमी रागाच्या भरात घेतलेले निर्णय चुकीचे असतात. तेनालीराम आपल्याला मनापासून खूप खूप धन्यवाद.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती