नवरा आणि नारळ !!

शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (12:38 IST)
नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची . बरं , घेताना फोडूनही बघता येत नाही.  दोन्हीही कसेही निघाले तरी " पदरी पडले, पवित्र झाले ". दोघांनाही देवघरात स्थान, दोघेही पुज्य.
 
पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. हल्ली ऑन लाईन साईट वर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. नारळ म्हटलं कि मला धडधडतं. चांगला ओळखायचा कसा ?
 
मी उगाचच कानाजवळ नेऊन हलवून वगैरे बघत असे. अण्णाला कळायचं हे गि-हाईक  नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. ये, लो ! म्हणायचा. मी विचारायचो "खवट" निकलेगा तो ? तो म्हणायचा "तुम्हारा नसीब !!"
 
आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय !
 
खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी....किती बहुगुणी !! 
 
थोडक्यात काय, 
नवरा काय ? नारळ काय ? गोड निघाला तर नशीब, खवट निघाला तर उपयोगी, हे कोकणी तत्त्वज्ञान. 
 
ह्याला जीवन ऐसे नांव !!
 
पु ल देशपांडे....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती