जागतिक पर्यावरण दिवस

बदलत्या काळात पर्यावरण वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे. यास्तव UNEP म्हणजे United Nations Environment Programme आणि न्यूझिलंड सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 जून 2009 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करीत असून यावर्षीचKick the habit ! Towards low carbon ecomony ol हे घोषवाक्य आहे.

जागतील जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे. जागतिक पर्यावरण दिवस- 2009 या वर्षाची संकल्पना ही बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे प्रमाण याविषयीची आहे.

जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा करता येऊ शकेल. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.

  ND
सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा वापर न करता स्वेटर घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु.