सरकार कुठल्या तोंडाने जनतेकडे मतं मागायला येते? – अजित पवार

फडणवीस सरकार महाजनादेश यात्रा काढतेय. पण पाच वर्षे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केलेली नाही, तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला नाही, किंवा जनसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, मग हे सरकार कुठल्या तोंडाने मतं मागायला येते? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.
 
पुढे पवार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पीकविमा कंपन्या पैसे खात आहेत. शिवसेना त्यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत. शिवसेनेला सांगायला हवे की ते सरकारमध्ये आहेत, मोर्चे कसले काढता, निर्णय घ्या..
 
गेली पाच वर्षे भाजपाने काम केले असते तर फडणवीस यांना महाजनादेशयात्रा काढायची गरज पडली नसती. मुख्यमंत्र्यांना जनतेने डोक्यावर घेतले पण हे सरकार फसवे निघाले, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना असंख्य आश्वासने दिली. मात्र निवडणूक जिंकून आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांना विसरले. फडणवीस जरी शेतकऱ्यांना विसरले असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी विसरू शकत नाही, म्हणून आज आम्ही सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आवाज उठवत आहोत, असेही मुंडे म्हणाले.
 
तसेच खा. अमोल कोल्हे यांनीदेखील यावेळी सरकारला धारेवर धरले. काम केले तर ते सांगण्याची गरज पडत नाही, उलट काम केले नाही तर उर बडवून सांगावे लागते. मुख्यमंत्री महाजनादेशयात्रा काढून तेच करत आहेत, असे कोल्हे म्हणाले. किनवट येथे एका ठिकाणी बॅनर लावलेले पाहिले की महाराष्ट्राचा राजा देवेंद्र... रेणुका मातेच्या साक्षीने सांगतो की, चंद्र-सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राचे राजे एकच... छत्रपती शिवाजी महाराज... असा खोडसाळपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही कोल्हे यांनी दिला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती