शिंदे गटात अंतर्गत नाराजी ; अनेक नेते भाजपवर नाराज

रविवार, 31 मार्च 2024 (10:38 IST)
मुंबई : शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं भाजपकडून कापली जात असल्यानं शिंदे गटात अंतर्गत नाराजीचा सूर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करतंय, अशी अनेक नेत्यांची भावना आहे. लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे, तर विधानसभेला काय होणार? या विषयीच्या चिंतेनं शिवसेनेतील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. जी कारणं देऊन ठाकरेंची साथ सोडली, त्याच्या उलट कृती होत असल्यानं शिवसेनेचे आमदार चिंतेत आहेत.
 
शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी का?
भाजपकडून शिवसेनेच्या खासदारांची तिकिटं कापली जात असल्याने शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजीचा सूर.
भाजपकडून निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून शिवसेनेच्या जागा अप्रत्यक्ष स्वत:कडे करत, खच्चीकरण करत असल्याची पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा.
लोकसभेतील विद्यमान खासदार मोठ्या विश्वासाने ठाकरेंची साथ सोडून युतीत सहभागी झाल्यानंतर एनवेळी अशी वागणूक मिळत असल्याने शिवसेनेत अंतर्गत नाराजी.
युतीतील चर्चेला फक्त शिवसनेतून फक्त मुख्यमंत्र्यांनाच बोलावलं जातं,राष्ट्रवादीतून मात्र दादा आणि पटेल उपस्थित असतात
भाजपबाबत होत असलेल्या जागेच्या वाटाघाटीत पक्षातील इतर नेत्यांना लांब ठेवत असल्याने पक्षातील नेते नाराज
लोकसभेलाच हिच परिस्थिती आहे तर विधानसभेला काय होणार, भविष्याच्या चिंतेने शिवसेनेतील आमदारांमध्ये  अस्वस्थता
जी कारणं सोडून ठाकरेंची साथ सोडली, त्या उलट कृती होत असल्याने आमदार चितेंत
भाजप, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पण, गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणाला ज्यांच्यामुळे अभूतपूर्व कलाटणी मिळाली आणि शिवसेनेत उभी फूट पडली, त्या शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र अद्याप एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा समोर आली आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप काही सुटण्याचं नाव घेत नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजुनही काही जागांबाबतचा तिढा कायम आहे. तर काही जागांवर अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
 
'या' जागांसाठी शिवसेना आग्रही, मात्र उमेदवार राष्ट्रवादी आणि भाजपचे
नाशकात हेमंत गोडसेंना एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी दिली, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची प्रचार सभाही झाली, पण आता ती जागा राष्ट्रवादीकडे जाणार असून तिथून छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा भाजपकडे गेली असून तिथून नारायण राणे लोकसभा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. तर, अमरावतीही भाजपकडे गेली असून तिथून नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. तसेच, मनसेनं युती केली तर दक्षिण मुंबईची जागा त्यांना दिली जाणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती