IND vs NZ: चुकीला माफी नाही! भारताला न्यूझीलंडपासून काय धोका आहे?

बुधवार, 15 नोव्हेंबर 2023 (08:23 IST)
ओंकार डंके
 प्रत्येक सामना जिंकून आत्तापर्यंत अपराजित असलेली टीम इंडिया आणि चांगल्या सुरुवातीनंतर धडपडत अंतिम चारमध्ये आलेल्या न्यूझीलंडमध्ये आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पहिली सेमी फायनल होणार आहे.
 
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 12 वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या टीमनं विश्वचषक उंचावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.
 
आता या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यापासून टीम इंडिया फक्त दोन सामने दूर आहे. त्यामधील पहिला अडथळा पहिला अडथळा मुंबईतच पार करावा आहे.
 
एक रेकॉर्ड तुटणार
न्यूझीलंडनं गेल्या चार वेगवेगळ्या स्पर्धेतील नॉक आऊट सामन्यात भारताला पराभूत केलंय. तर गेल्या तीन वन-डे विश्वचषक स्पर्धेत यजमान टीमकडून पराभव झाल्यानं त्यांना स्पर्धेतून बाहेर जावं लागलंय.
 
मुंबईतील सामन्याचा काहीही निकाल लागला तरी या दोन्हीपैकी एक रेकॉर्ड तुटणार हे नक्की आहे.
 
मानसिक दबाव जास्त!
न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात पराभूत होण्याचा मानसिक दबाव सोडला तर टीम इंडियाची कामगिरी सध्या प्रत्येक बाबतीत न्यूझीलंडपेक्षा वरचढ आहे.
 
भारताच्या टॉप पाचपैकी चार जणांची या स्पर्धेतील सरासरी ही 50 पेक्षा जास्त आहे. तीन फास्ट बॉलर्सनी मिळून 45 विकेट्स घेतल्यात. स्पिनर्सही त्यांचं काम करत असल्यानं संघाला हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये सहाव्या गोलंदाजाची गरज भासलेली नाही.
 
चुकीला माफी नाही!
अर्थात सेमी फायनलमध्ये ‘चुकीला माफी नाही’ शेवटपर्यंत झुंज देत संधी मिळाली की पुनरागमन करण्याची न्यूझीलंडची सवय टीम इंडियाला चांगलीच माहिती आहे.
 
सलामीवीर राचिन रविंद्र या विश्वचषक स्पर्धेचं ‘फाईंड’ ठरलाय. आजवर एकाही खेळाडूला पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत तीन शतक झळकवता आले नव्हते. राचिननं तो विक्रम 23 व्या वर्षीच केलाय.
 
कर्णधार केन विल्यमसनला सूर गवसल्यानं न्यूझीलंडची फलंदाजी मजबूत झालीय. डॅरिल मिचेल प्रत्येक सामन्यात धावा काढतोय. भारताविरुद्धही त्यानं शतक झळकावलं होतं.
 
वानखेडेच्या पिचवर विशेषत: दुसऱ्या इनिंगमध्ये ट्रेंट बोल्टचा सुरूवातीचा स्पेल भारतीय फलंदाजांसाठी मोठी परीक्षा असेल. अर्थात बोल्टचा 2019 चा साथीदार मॅट हेन्री दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडलाय.
 
न्यूझीलंडची स्पिन गोलंदाजी ही 2019 पेक्षा अधिक धोकादायक आहे. मिच सँटनर या स्पर्धेत सातत्यानं विकेट घेण्याची कामगिरी करतोय. तर ग्लेन फिलिप्सनं आजवर कधीही केली नाही इतकी गोलंदाजी या विश्वचषकात केलीय.
 
भारताचे सर्वच फलंदाज स्पिन बॉलिंग उत्तम पद्धतीनं खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सँटनर आणि फिलिप्सला अधिक तयारीनं वानखेडेवर उतरावं लागेल. त्याचबरोबर पाचव्या बॉलर्सच्या 10 ओव्हर्समध्ये जास्तीत जास्त रन करण्याची संधी टीम इंडियाला आहे.
 
विराट – रोहितची परीक्षा
विराट कोहली सलग चौथ्यांदा आणि रोहित शर्मा सलग तिसऱ्यांदा वन-डे विश्वचषकाची सेमी फायनल खेळणार आहे. विराटला मागील तीन सेमी फायनलमध्ये एकदाही दोन अंकी धावा काढता आलेल्या नाहीत. तर रोहितलाही आत्तापर्यंत नॉक आऊट सामन्यात अर्धशतक झळकावण्यात अपयश आलंय.
 
या दोघांच्या आजवरच्या कारकिर्दीमधील एक खडतर परीक्षा मुंबईत होणार आहे. त्यांचा फॉर्म पाहता ते जुनं अपयश भरुन काढतील असा ठाम विश्वास आहे. टीम इंडियाच्या या सर्वात अनुभवी फलंदाजांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याची गरज आहे.
 
विराट- रोहित त्यांच्या लौकिकाला जागले तर आयसीसी विजेतेपदाचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टीम इंडिया मुंबईत उचलेल हे नक्की.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती