IND vs BAN : विराट कोहलीच्या शतकासाठी अंपायरनी वाईड दिला नाही, हे नियमात बसतं का?

शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (07:35 IST)
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात विराट कोहलीच्या शतकाइतकीच अंपायर रिचर्ड रिचर्ड केटलबरो यांच्या निर्णयाची देखील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगलीय.
टीम इंडियाच्या इनिंगमधील 42 व्या ओव्हरमध्ये भारताला जिंकायला 2 धावांची गरज होती. विराट शतकापासून 3 धावांनी दूर होता.
 
बांगलादेशकडून फिरकी गोलंदाज नसुम अहमदनं 42 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमधील पहिलाच बॉल वादग्रस्त ठरला.
 
नसुमनं तो बॉल लेग साईडला टाकला होता. विराट कोहली देखील त्यावेळी काहीसा आत सरकला. त्यावेळी अंपायर तो नो बॉल दिला नाही.
 
मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यातील वाईड बॉलचे कडक नियम लक्षात घेता तो नो बॉल असेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण अंपायर केटलबरो यांनी तो बॉल वैध ठरवला.
 
नसुमनं बॉल टाकल्यानंतर विराट काहीसा आत सरकला होता. त्यानंतर तो बॉल त्याच्या शरीराच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे केटलबरो यांनी तो नो बॉल दिला नाही, असं मत त्यावेळी समालोचकांनी व्यक्त केलं.
 
अंपायरच्या या निर्णयाचा विराटनं फायदा उठवला. त्यानं नसुमला षटकार लगावत आपल्या शतकासह टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
नियम काय सांगतो?
अंपायरच्या निर्णयातील नियम क्रमांक 2.12 नुसार एखादा निर्णय ते तात्काळ दुरुस्त करु शकतात. नियम क्रमांक 20.6 नुसार डेड बॉलचा निर्णय बदलता येत नाही. त्याखेरीच मैदानात अंपायरनं दिलेला निर्णय अंतिम असतो, तो नंतर बदलता येत नाही.
 
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय
भारतानं बांगलादेशचा 7 विकेट्सनं पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवलाय. विराट कोहलीचं 48 वं शतक या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.
 
विराट कोहलीनं षटकार लगावत त्याच्या शतकासह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विराटनं हे शतक 97 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं पूर्ण केलं.
 
या शतकासह गहुंजे इथल्या एमसीए स्टेडियमवरचा भन्नाट रेकॉर्डही विराटनं कायम राखलाय. विराटनं इथं आठ सामने खेळले असून त्यामध्ये त्यानं तीन शतक आणि तीन अर्धशतक झळकावले आहेत.
 
विराटचं या स्पर्धेतील हे पहिलंच शतक आहे. त्यानं यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्धही अर्धशतक झळकावलं होतं.
 
विराटला केएल राहुलनं चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 83 धावांची भागिदारी केली. राहुलनं 34 बॉलमध्ये 34 धावा केल्या.
 
भारताची दमदार सुरूवात
बांगलादेशनं दिलेल्या 257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं आक्रमक सुरूवात केली. दुसरा सलामीवीर शुबमन गिलनंही सेट झाल्यावर चांगली फटकेबाजी केली.
 
रोहित शर्माचं अर्धशतक 2 धावांनी हुकलं. त्यानं 40 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 48 धावा केल्या. हसन महमूदनं रोहितला बाद केलं.
 
शुबमन गिलनं विश्वचषक स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 52 बॉलमध्ये पूर्ण केलं. वन-डे कारकिर्दीमधील त्याचं हे दहावं अर्धशतक आहे.
 
शुबमनला डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळता आले नव्हते. अहमदाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्यानं टीममध्ये पुनरागमन केलं.
 
शुबमन अर्धशतकानंतर लगेच बाद झाला. मेहदी हसनला षटकार लगावण्याचा त्याचा प्रयत्न फसला. महमदुल्लानं बाऊंड्री लाईनवर त्याचा चांगला झेल घेतला. गिलनं 53 धावा केल्या.
 
टीम इंडियाचा पुढील सामना 22 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध धरमशालामध्ये होणार आहे. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोनच संघ आत्तापर्यंत अपराजित आहेत.
 
त्यापूर्वी बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 256 धावा केल्या होत्या.
 
या सामन्यात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. तांझिद हसन आणि लिटन दास या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली.
 
वन-डे विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागिदारी आहे.
 
कुलदीप यादवनं तांझिदला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर 1 बाद 93 वरुन बांगलादेशची 4 बाद 137 अशी घसरण झाली.
 
अनुभवी मुश्फिकुर रहीमनं तौहित ऱ्हिदोयसोबत पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागिदारी करत ही पडझड रोखण्याचा प्रयत्न केला.
 
तौहित ऱ्हिदोयचा संघर्ष या सामन्यातही सुरूच होता. त्यानं 16 धावा करण्यासाठी 35 बॉल घेतले. शार्दूल ठाकूरला फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.
 
बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुश्फिकुर रहीमला या स्पर्धेतील सलग तिसरं अर्धशतक झळकावता आलं नाही. जसप्रीत बुमरानं त्याला 38 धावांवर बाद केलं. रविंद्र जाडेजानं उजवीकडं झेपावत त्याचा भन्नाट झेल घेतला.
 
मुश्फिकूर बाद झाल्यानंतर महमदुल्लानं 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 36 बॉलमध्ये 46 धावा केल्या. बुमरानं शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला बाद केलं.
 
भारताकडून बुमरा सिराज आणि जाडेजानं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांना 1-1 विकेट मिळाली.
 
हार्दिकच्या दुखापतीनं वाढवली चिंता
भारताकडून हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरची सुरूवात केली होती. लिटन दासनं त्याच्या पहिल्या तीन बॉलवरच दोन चौकार लगावले. लिटननं लगावलेला फटका अडवताना हार्दिकचा पाय दुखावला.
 
हार्दिकवर काही वेळ मैदानात उपचार करण्यात आले. त्या उपचारानंतरही त्याला गोलंदाजी करणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर रोहितनं विराटला हार्दिकची उर्वरित ओव्हर पूर्ण करण्यास सांगितलं.
सध्या हार्दिकच्या दुखापतीची तपासणी करण्यात येतीय. हार्दिकच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विट करून दिलीय.
 
या सामन्यासाठी दोन्ही संघ असे आहेत :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
 
बांगलादेश : तांझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांटो (कर्णधार), तौहिद ऱ्हिदोय, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहिदी हसन मिराझ, महमदुल्ला, नसुम अहमद, हसन महमुद, शोरीफुल इस्लाम, मुस्ताफिजूर रहमान
 
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांचा इतिहास काय आहे?
यापूर्वीचा इतिहास काहीही असला तरी मैदानात उतरल्यावर तो कामाला येत नाही. हा खेळातला नियम अफगाणिस्ताननं इंग्लंडला आणि नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सिद्ध केलाय.
 
2007 मधील अनुभव गाठीशी असल्यानं भारतीय टीम तरी बांगलादेशला कमी लेखण्याची चूक कधीही करणार नाही.
 
16 वर्षांपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून पराभूत झाल्यानं टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.
पुण्यात 27 वर्षांनी सामना
भारत- बांगलादेश सामन्याचा निकाल काहीही लागो. या सामन्यातील पहिला बॉल पडताच पुण्यात एक नवा इतिहास रचला जाईल.
पुण्यात तब्बल 27 वर्षांनी वर्ल्ड कप मॅच होते आहे. याआधी नेहरू स्टेडियमवर 1996 सालच्या विश्वचषकात वेस्ट इंडीज विरुद्ध केनिया सामना झाला होता, ज्यात केनियानं विंडीजला 73 रन्सनी हरवलं होतं.
 
गहुंजे इथल्या एमसीए स्टेडियमवर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सामन्याचं आयोजन होतंय.
 
उपांत्य फेरीवर नजर
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यावर विजय मिळवून पुण्यात दाखल झालीय. तर, बांगलादेशला पहिल्या तीन सामन्यात एकच विजय मिळवता आलाय.
 
या स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेनं दमदार पाऊल टाकण्याची संधी यजमानांना आहे.
 
कर्णधार रोहित शर्माला गवसलेला फॉर्म ही टीम इंडियाची या स्पर्धेतील सर्वात दिलासादायक बाब आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितनं अफगाणिस्तान विरुद्ध विक्रमी शतक झळकावलं. तर पाकिस्तान विरुद्ध आणखी खेळ उचांवत रोहितनं 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली होती.
 
शुबमन गिलच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आणखी मजबूत झालीय. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनीही या स्पर्धेत अर्धशतक झळकावलंय.
 
जसप्रीत बुमरा हे गोलंदाजीत भारतीय टीमचं मुख्य अस्त्र आहे. बुमरानं पहिल्या तीन सामन्यात 8 विकेट्स घेतल्यात. त्याला कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजाची उत्तम साथ मिळतीय.
 
शार्दूल ठाकूरला मागील दोन सामन्यात फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. पण पुण्यात शार्दूलचा रेकॉर्ड चांगला असून त्यानं इथं 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्यात.
 
बांगलादेशच्या बाजूची गोष्ट
बांगलादेशला 2007 नंतर भारतीय टीमला एकदाही हरवता आलेलं नाही. पण,दोन्ही टीममधील मागच्या चार सामन्यांचा इतिहास बांगलादेशच्या बाजूनं आहे.
 
पाहुण्या टीमनं मागील चार पैकी तीन सामन्यात टीम इंडियाचा पराभव केलाय. यामध्ये नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेतील सामन्याचाही समावेश आहे.
 
बांगलादेशला सलामीवीर लिट्टन दासकड़ून मोठी अपेक्षा असेल. लिटननं इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.
मेहिदी हसन मिराझचा भारताविरुद्धचा फॉर्मही बांगला टायगर्ससाठी जमेची बाजू आहे. भारतीय टीमनं 2022 साली बांगलादेशचा दौरा केला होता.
 
त्या दौऱ्यातील तीन वन-डे सामन्यात मेहिदीनं 141 धावा आणि 11 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.
 
2007 मधील ऐतिहासिक विजयाचा अनुभव असलेल्या कर्णधार शाकीब अल हसन आणि यष्टीरक्षक मुश्फिकूर रहीम यांची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे. या अनुभवी खेळाडूंना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना खास रणनीती आखावी लागेल.
 
पुण्यातील इतिहास कुणाच्या बाजूनं?
गहुंजेतील एमसीए स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी संमिश्र आहे. इथं झालेल्या सात पैकी चार सामन्यात भारतीय टीमनं विजय मिळवला असून तीन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.
 
बांगलादेशची टीम पुण्यात पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळतीय
सात सामन्यांपैकी 4 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तर 3 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं इथं बाजी मारलीय.
 
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची येथील सरासरी धावसंख्या 307 असून दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 281 आहे.
 

















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती