31 मार्च नव्हे, बंदचा निर्णय पुढील आदेशापर्यंत: अजित पवार

शुक्रवार, 20 मार्च 2020 (18:46 IST)
करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून राज्य सरकारनं मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पण हा निर्णय 31 मार्च नव्हे तर पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
 
पत्रकार परिषेदेत ते म्हणाले की लग्न समारंभ आणि अंत्यविधीसाठी गर्दी करू नका. अगदीच शक्य नसेल तर मुलाकडचे आणि मुलीकडचे असे २५ लोक मिळून ते लग्न पार पाडा असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येतं आहे की सर्वतोपरी काळजी घ्या आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. 
 
प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक नागरिकाने इच्छाशक्ती दाखवून घरी राहिलं पाहिजे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कोणीही अफवा पसरवू नका असंही आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
 
कंपन्यांना आर्थिक नुकसान झेलावं लागणार असून माणूस गमावण्यापेक्षा आर्थिक नुकसान परवडलं त्यामुळे कंपन्यांनी सहकार्य करावं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती