महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण असून आता पाकिस्तानी सीमा सील केली जाईल

रविवार, 15 मार्च 2020 (10:49 IST)
भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली (Corona Virus Cases Crosses 100) आहे. महाराष्ट्रात काल आणखी पाच कोरोना संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर पोहोचली आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
 
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका पाहता केंद्र सरकारने कोविड-19 ला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. तर आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क देशांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोरोना संकटावर चर्चा करतील.
 
महाराष्ट्रात आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण
 
देशात पहिले कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 होती. मात्र, शनिवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात महाराष्ट्रात आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. यामध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या पाचपैकी चारजण हे दुबईला गेले होते तर पाचवी व्यक्ती ही थायलंडला गेली होती. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 26 वरुन 31 झाली आहे.
 
महाराष्ट्रात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
 
पुणे – 15
मुंबई – 5
नागपूर – 4
यवतमाळ – 2
नवी मुंबई – 2
ठाणे – 1
कल्याण – 1
अहमदनगर – 1
 
पाकिस्तानी सीमा सील केली जाईल
 
केंद्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच शेजारी देशांना लागून असलेल्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर कारलवाई करत भारत-नेपाळ, भारत-बांग्लादेश, भारत-भूटान, भारत-म्यानमार सीमा सील करण्यात आल्या आहेत. ही कारवाई 14 मार्चला रात्री 12 वाजता करण्यात आली. तर 15 मार्च म्हणजेच आज रात्री 12 वाजेपासून पाकिस्तानी सीमाही सील करण्यात येईल. आता या सीमांवरुन प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती