उद्धव ठाकरे LIVE: विधानसभा अधिवेशनात आमदारांचे शपथविधी सुरू

बुधवार, 27 नोव्हेंबर 2019 (09:30 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर तब्बल 33 दिवसांनंतर अखेर आमदारांना विधानसभेत शपथ घेण्याची संधी मिलाळी.
 
देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचं सरकार अवघ्या साडेतीन दिवसात कोसळलं आणि महाविकास आघाडीकडे सत्ता येणार आहेत.
 
मुख्यमंत्रिपदाची शपथ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला संध्याकाळी शिवाजी पार्कात घेतील. अन्य मंत्र्यांच्या शपथविधीसंबंधी नंतर निश्चित केलं जाईल, असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
 
आज विधानसभेत सर्वप्रथम सर्व आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदार कोळंबकर हे शपथ देतील आणि त्यानंतर विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान घेतलं जाईल.
 
या सगळ्यात, अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार का, हा प्रश्न अनेकांना विचारला जातो आहे. या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी म्हटलं, की "अजित पवार हे अजूनही पक्षाचे नेते आहेत."
 
पाहा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स इथे -
सकाळी 9.48 वाजता : महाराष्ट्र कधी झुकणार नाही - संजय राऊत
नव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे आणि नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी चालू आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले,
"महाराष्ट्र कधी झुकणार नाही, कधी तुटणार नाही. माझी जबाबदारी कमी झाली. महाराष्ट्राला नवं सरकार मिळणार आहे. सरकार आणि पक्षसंघटना या वेगळ्या गोष्टी आहेत. मी पक्षाचं काम करतोय. माझं मिशन पूर्ण झालं. आता मी उद्यापासून माध्यमांशी बोलणार नाही. इतकंच सांगेन की मी जेव्हा म्हटलं की मुख्यमंत्री आमचा असेल तेव्हा लोक आमच्यावर हसले. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमचं सुर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आणि तसंच झालं. आता उद्यापासून मला सामनावरच लक्ष केंद्रित करायचं आहे."
 
सकाळी 8.14 वाजता: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या...
"आमचं स्वप्न सत्यात आणायला आम्ही खूप संघर्ष केला आहे. आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणार," असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
 
सकाळी 8.11वाजता:'जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू'
 
येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
 
सकाळी 8.05 वाजता: अभी तो पूरा आसमान बाकी - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
सकाळी 8 वाजता: विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे या विधानसभेच्या दारावरच सर्व आमदारांचं स्वागत करत आहेत.
 
मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच आमदार त्यांचा रामराम घेत आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाऊ अजित पवार यांचंही त्यांनी मिठी मारून स्वागत केलं.
गेल्या काही दिवसांतलं नाट्य
23 नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास शपथविधी करून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यासह देशात राजकीय भूकंप घडवला.
 
मात्र त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार एक-एक करून परतू लागले आणि बहुमताचे आकडे जुळवण्यात भाजपसमोरील अडचणी वाढू लागल्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज 27 नोव्हेंबरला विश्वासदर्शक ठराव घेण्याचा आदेश दिल्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला आणि अवघ्या साडेतीन दिवसातच फडणवीस-अजित पवार सरकार कोसळलं.
 
त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपण राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करू असं म्हटलं. या तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदार आहेत. मात्र, या पक्षांनाही आपल्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, हे सिद्ध करावं लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती