भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधींनी प्रयत्न करावेत - हुसेन दलवाई

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (16:38 IST)
सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून राज्यात भेटीगाठी आणि वक्तव्यांचं सत्र सुरू आहे.
 
कुठल्याही स्थितीत राज्यात भाजपचं सरकार येऊ नये, भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधींनी प्रयत्न करावेत असं, काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी म्हटलंय.
 
दलवाई यांनी सामनाच्या कार्यालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
 
"आम्ही भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणतो म्हणजे याचा अर्थ बराच आहे, भाजप पेक्षा शिवसेना ठिक आहे," असं सूचक वक्तव्य हुसेन दलवाई यांनी केलं आहे.
 
भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक
भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.
 
पण या बैठकीनंतर पुन्हा एकदा 'गोड बातमी लवकरत येईल' असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. तसंच शरद पवारांच्या वक्तव्याचं स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
जनादेश शिनसेना-भाजपला मिळाला आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
 
योग्यवेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल, महाराष्ट्र पुरोगामी आहे, इथं वेगवेगळ्या पक्षाते नेते एकमेकांना भेटत असतात, असं संजय राऊत यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीवर मुनगंटीवर म्हणालेत.
 
'वाघ कुठलाही असो कुणाचाही असो संरक्षण-संवर्धन होणारच', असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी यावेळी केलं आहे.
 
अहमद पटेल यांनी नितीन गडकी यांची नवी दिल्लीत भेट घेतली त्यावर "गुजरातमधले रस्ते चांगले व्हावे यासाठी अहमद पटेल हे गडकरींना भेटले," असं स्पष्टीकरण मुनगंटीवारांनी दिलं आहे.
 
तर "आजची बैठक ही ओल्या दुष्काळासंबधी होती. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालय त्यांना २५ हजार हेक्टरी मदत मिळाली पाहीजे ही भूमिका उध्दव ठाकरेंची आहे. ती आम्ही बैठकीत मांडली. मुख्यमंत्री या मदतीसंदर्भात सकारात्मक आहेत," असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलं.
 
"सत्तास्थापनेचा कोणताही संदेश मातोश्रीवर घेऊन जाण्याचा प्रश्न नाही. आजचा विषय हा दुष्काळाचा होता. सत्तास्थापनेचा निर्णय उध्दव ठाकरेंचा आहे," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती