सचिन वाझे: पॅरोलवर बाहेर विनायक शिंदेकडून मनसुख हिरेनची हत्या, पोलिसांचा दावा

मंगळवार, 23 मार्च 2021 (20:33 IST)
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात झालेल्या तपासाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.
मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेंनी पॅरोलवर बाहेर असलेल्या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा वापर केल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाने दिली आहे.
मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रमुख हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र ATS ने ही माहिती दिलीये.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी वाझे सद्या NIA च्या कोठडीत आहेत. 25 मार्चला NIA ची कोठडी संपणार आहे.
"मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझेंच्या चौकशीसाठी ATS ने NIA कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती," महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिली.
हिरेन यांच्या हत्येप्रकरणी मुंबई ATS ने निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि बुकी नरेश गोरला अटक केलीये. कोर्टाने दोन्ही आरोपींना 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
 
काय म्हणाले ATS प्रमुख?
बुधवारी महाराष्ट्र ATS ने मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तपासाची माहिती दिली. मनसुख हिरेन यांच्या प्रत्नीच्या तक्रारीनंतर ATS ने हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
महाराष्ट्र ATS प्रमुख जयजीत सिंह म्हणाले, "विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनला फोन करून बोलावलं होतं. त्याने हिरेनचा खून केला. याचे पुरावे मिळाले आहेत."
ATS अधिकारी माहिती देतात, मनसुख हिरेनच्या हत्येवेळी शिंदे रेतीबंदर परिसरात उपस्थित होते.
विनायक शिंदेला 2007 मध्ये लखन भय्या फेक एन्काउंटर प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. कोरोना काळात शिंदे पॅरोलवर बाहेर होता. एटीएसचे अधिकारी सांगतात, शिंदे पेरोलवर बाहेर आल्यापासून वाझे यांच्यासाठी काम करत होता.
ATS ने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला हत्येच्या ठिकाणी नेऊन हत्या कशी केली याचं रिक्रिएशन करून घेतलंय. एटीएसने तपासात अनेक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत.
"आरोपींनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले आहेत," अशी माहिती ATS प्रमुख जयजीत सिंह यांनी दिलीये.
ATS अधिकारी सांगतात, नरेश गोरने 14 सामकार्ड गुजरातहून आणले होते. यापैकी 5 सामकार्ड विनायक शिंदे यांना देण्यात आले होते.
 
'वाझे खोटं बोलले'- दशतवाद विरोधी पथक
ATS चे अधिकारी सांगतात, "मनसुख हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाझे यांची चौकशी करण्यात आली. सचिन वाझे यांनी आपल्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. गाडी मी वापरत नव्हतो असं वाझे यांनी म्हटलं होतं."
एटीएस प्रमुख सांगतात, "वाझे खोटं बोलले यांचे पुरावे मिळाले आहेत. या हत्या प्रकरणात वाझे यांचा सहभाग काय? याचा तपास सुरू आहे."
 
हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी जप्त ?
बुधवारी ATS च्या अधिकार्यानी दीव-दमणहून एक गाडी जप्त केली आहे.
"ही गाडी तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे. ही गाडी खून करण्यासाठी वापरण्यात आली का नाही याची चौकशी करत असल्याचं, " अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीत सिंह म्हणाले.
ते पुढे म्हणाले "या गुन्ह्यांत येत्या काळात आणखी लोक अटक करण्याची शक्यता आहे."
ATS अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काही साक्षीदारांचा न्यायाधीशांपुढे जबाब नोंदवण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती