रश्मी शुक्ला : फोन टॅपिंगचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

शुक्रवार, 26 मार्च 2021 (19:27 IST)
महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्लांचा फोन टॅपिंग अहवाल लीक झाल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने गुन्हा दाखल करण्यास सुरूवात केली आहे.
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
अज्ञात व्यक्तींविरोधात क्राइम ब्रांच हा गुन्हा नोंदवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गुरूवारी (25 मार्च) महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनीच फोन टॅपिंगला अहवाल उघड केल्याचा संशय व्यक्त केला होता.
राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा दाखला देत पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना भेटून मागणी केली होती.
 
रश्मी शुक्ला यांनीच 'टॉप सिक्रेट' अहवाल फोडल्याचा संशय - सीताराम कुंटे
महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त आणि वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगप्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अहवाल सूपूर्द केलाय. गुरुवारी (25 मार्च) सीताराम कुंटे यांनी पाच पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. हा अहवाल बीबीसी मराठीच्या हाती लागला आहे.
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी मिळालेल्या परवानगीचा गैरवापर केल्याचं या अहवालात सीताराम कुंटे यांनी म्हटलं आहे. तसंच, रश्मी शुक्ला यांनीच फोन टॅपिंगचा टॉप सिक्रेट अहवाल फोडल्याचा संशय सीताराम कुंटे यांनी आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. तसंच, हा संशय सिद्ध झाल्यास शुक्लांवर कारवाईचे संकेतही सीताराम कुंटे यांनी दिलेत.
रश्मी शुक्लांवर अवैधरित्या फोन टॅपिंगचा आरोप सरकारमधीलच काही नेत्यांनी केला होता. दुसरीकडे, रश्मी शुक्लांच्या अहवालाचा दाखल देत, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि बदलीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि चौकशीची मागणीही केली होती.
हे सर्व लक्षात घेता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना आज (25 मार्च) अहवाल सादर केला.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे या अहवालात म्हणतात, "रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याची शक्यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली. ज्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून इंडियन टेलिग्राफ अक्टखाली परवानगी घेतली असल्याचं निदर्शनास आलं."
सीताराम कुंटे यांनी उद्धव ठाकरेंन सादर केलेल्या अहवालात काय म्हटलंय?
राज्याचे मुख्य सचिव आपल्या अहवालात म्हणतात, "इंडियन टेलिग्राम अॅक्टची तरतूद देशविघातक कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आहे. राजकीय मतभेद, व्यावसायिक तंटे, कौटुंबिक कलह यांसारख्या गोष्टींसाठी याचा वापर अभिप्रेत नाही. मात्र, या मूळ उद्देशाचा वेगळ्या प्रयोजनासाठी गैरवापर करण्यात आला."
 
कुंटे आपल्या अहवालात पुढे सांगतात -
मिळालेल्या परवानगीच्या आधारे त्यांनी अशाकाही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ज्यांच्या संभाषणातून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात उल्लेख होता
ज्या कालावधीत त्यांनी खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. त्यावेळी प्रशासन कोरोनाच्या व्यवस्थापनात गुंतलेलं असल्याने IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे कोणतेही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नव्हते
रश्मी शुक्ला यांच्या अहवालात नमूद खासगी व्यक्तींच्या संभाषणाचा संदर्भ कोणत्याही IPS अधिकाऱ्यांच्या बदलीशी जोडणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यावर कारवाईची आवश्यकता भआसली नाही.
शुक्ला यांनी उघड केला गोपनीय अहवाल?
रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक केला. त्यावेळी माझ्याकडे सहा जीबी डाटा असल्याचं फडणवीस यांनी दावा केला होता.
त्यावर कुंटे आपल्या अहवालात म्हणतात, "सरकारला पोलीस महासंचालकांनी पाठवलेल्या अहवालासोबत पेन ड्राइव्ह नव्हता. उघड झालेल्या अहवालाची पत्र रश्मी शुक्ला यांच्या ऑफिस कॉपीची असल्याचं दिसतं. यावरून ही प्रत शुक्ला यांनीच उघड केली असावी असा संशय येतो."
ते पुढे म्हणतात, हा अहवाल गोपनीय असतानाही उघड करण्यात आला ही बाबत गंभीर आहे आणि सिद्ध झाल्यास त्या कठोर कारवाईसाठी पात्र ठरतील."
"या बदल्यांचे तथाकथित निर्णय आणि प्रत्यक्षात सरकारने घेतलेले निर्णय यात कोणतंही साम्य नाही. या अहवालातून नेमकं कोणतही गैरकृत्य झाल्याचं समोर आलेलं नाही," असं कुंटेंनी म्हटलंय.
रश्मी शुक्लांनी मागितली होती माफी?
रश्मी शुक्ला गेल्याकाही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. फोन टॅपिंग आणि पोस्टिंगमध्ये भ्रष्टाचार या मुद्यांवर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग प्रकरणी सरकारची माफी मागितल्याचा दावा केला होता.
यावर सीताराम कुंटे आपल्या अहवालात पुढे म्हणतात, "रश्मी शुक्ला यांनी माझी, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपली चूक कबूल करून त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. पण अहवाल परत घेण्यात आला नाही. सहानूभूती आणि सौजन्याच्या दृष्टीकोनातून प्रस्तावित कारवाईबाबत पावलं उचलण्यात आली नाहीत."
 
पोलिसांच्या बदल्या झाल्या का?
जानेवाली 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान 167 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यापैकी 13 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या फेब्रुवारी 2020 ते जून 2020 मध्ये करण्यात आल्या. यातील 4 अपवाद वगळता इतर सर्व बदल्या पोलीस आस्थापना मंडळ-1 च्या शिफारसीप्रमाणे करण्यात आल्या.
सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत 154 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पोलीस आस्थापना मंडळाची शिफारस विचारात घेऊन बदल्या करण्यात आल्या.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती