नितीन राऊत : 'मुंबईतील वीज कंपन्यांवरील सायबर हल्ल्याचा अहवाल विधिमंडळात मांडणार'

मंगळवार, 2 मार्च 2021 (17:35 IST)
मुंबईतील वीज कंपन्यांवरील सायबर हल्ल्याचा अहवाल उद्या (2 मार्च 2021) विधिमंडळात ठेवणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.
 
"केंद्र सरकार म्हणतं ह्युमन एरर आहे. पण त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या. अहवाल विधिमंडळात सादर केल्यावर मग त्यांना विचारेन," असंही राऊत म्हणाले.
 
तसंच, केंद्रीय उर्जामंत्री आर के सिंह यांनी फोन केला होता, पण मी अधिवेशनात होतो, अशी माहितीही नितीन राऊत यांनी दिली.
 
आतापर्यंत काय घडलंय?
मुंबईमध्ये 12 ऑक्टोबरला झालेल्या पॉवर कटमागे चिनी हॅकर्सचा हात असल्याची शक्यता केंद्र सरकारनं फेटाळून लावली. पण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र यामगे विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटलं आहे की, 19 नोव्हेंबर 2020 ला आम्हाला CERT-In कडून एक ईमेल आला होता. पोसोकोच्या काही कंट्रोल सेंटर्समध्ये शॅडो पॅड या मालवेअरसंबंधीची धमकी यामध्ये होती. त्यानंतर आम्ही योग्य ती कारवाईही केली होती.
 
"NCIIPC नेही आम्हाला 12 फेब्रुवारीला शॅडो पॅड मालवेअरबद्दलच्या धोक्याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर सरकारने योग्य ती कृती करत त्यासंबंधीचे सर्व NCIIPC च्या मेलमध्ये असलेले सर्व डोमेन्स आणि आयपी अड्रेस ब्लॉक केले होते," असंही ऊर्जा मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
 
ऑक्टोबरच्या बत्तीगुलमागे सायबर हल्ल्याची शक्यता - अनिल देशमुख
दरम्यान, मुंबईत 12 ऑक्टोबरच्या बत्तीगुलमागे सायबर हल्ला झाला असल्याची शक्यता पुढे आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. 14 ट्रोजन हॉर्सेस मालवेअर सर्व्हरमध्ये टाकण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो असा अहवाल आल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रिट जर्नलमध्ये या संदर्भातलं एक वृत्त छापून आलं आहे. त्यात 12 ऑक्टोबरच्या बत्तीगुलमागे चीन आणि इतर काही देशांकडून झालेल्या सायबर हल्ला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (1 मार्च 2021) मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी गृह खात्यानं याबाबत केलेल्या चौकशीचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
 
या अहवालात नेमकं काय आहे हे सांगण्यास दोन्ही मंत्र्यांनी नकार दिला आहे. पण, काही मुलभूत माहिती त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितली.
 
"न्यूयॉर्क टाईम्सला बातमी आली आहे. अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्यूचर्स कंपनीनेही रिपोर्ट जाहीर केला. त्यात त्यांनी शक्यता वर्तवली आहे. मुंबईच्या इलेक्ट्रीकल सप्लायर्समध्ये मालवेअर टाकण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली," असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.
 
"या प्रकरणी महाराष्ट्र सायबरला पडताळणी करण्याचे काम दिलं होतं. यासंदर्भात रिपोर्ट आला आहे. त्यानुसार आठ जीबी डाटा फॉरेन अनकाऊंडेटमधून ट्रान्सफर झालेला असू शकतो. सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्ट्प झाल्याची शक्यता आहे. सायबर सॅबॉटाजची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे," असं देशमुख यांनी सांगितलं आहे.
 
काही ब्लॅक लिस्टेड आयटी कंपन्यांनी इलेक्ट्रिकल लॉग इन करण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, असं त्यांनी सांगितलंय.
 
काही परदेशी कंपन्यांनी हा प्रयत्न केला असं चौकशीत समोर आल्याचं देशमुखांनी सांगितलं आहे. चीनचा उल्लेख महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालात नाही, असंही देशमुख यांनी स्पष्ट केलंय.
 
दरम्यान "हा रिपोर्ट वाचल्यानंतरच यावर बोलू. केंद्र, राज्य आणि MERC चे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. अधिवेशन सुरू असल्याने इथं जास्त बोलू शतक नाही. मी याबाबत विधानसभेत संपूर्ण माहिती देईल," असं ऊर्जा मंत्र नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
 
न्यूयॉर्क टाइम्सने नेमकं काय छापलं आहे?
गेल्यावर्षी 12 ऑक्टोबरला मुंबई आणि उपनगरातला वीजपुरवठा काही तासांसाठी ठप्प झाला होता. ही तांत्रिक समस्या नव्हती, तर चीननं भारतावर केलेला सायबर हल्ला होता, असा दावा न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील एका बातमीत करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र सरकारनं न्यूयॉर्क टाइम्समधील बातमीची दखल घेतली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाकडून त्यासंबंधीचा अहवाल मागवला आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
 
जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. त्यानंतर चारच महिन्यात मुंबईतला वीजपुरवठा ठप्प झाला होता.
 
न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार ही घटना चीनकडून नियोजित केल्या गेलेल्या एका सायबर हल्ल्याचा भाग होती. भारतातील पॉवर ग्रिड ठप्प करणं हा या हल्ल्यामागचा उद्देश होता. गलवानमध्ये भारताकडून अधिक तीव्र हालचाल झाली तर संपूर्ण देशात पॉवर कट घडवून आणण्याचीही चीनची योजना होती.
 
अमेरिकन सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरनं चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा केला आहे. अर्थात, चीनचे बहुतांश मालवेअर सक्रीय झालेच नसल्याचंही रेकॉर्डेड फ्युचरच्या अभ्यासातून समोर आलं आहे.
 
रेकॉर्डेड फ्युचरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर स्टुअर्ट सोलोमन यांनी स्पष्ट केलं की चिनी कंपनी रेड इकोनं सायबर हल्ल्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन एक डझनहून अधिक पॉवर ग्रिड कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता.
 
नेमकं काय घडलं होतं?
12 ऑक्टोबर 2020 सकाळीच मुंबई शहरातल्या बहुतेक भागातली वीज गायब झाली होती. 10 वाजून 15 मिनिटांनी वीज पुरवठा बिघाडाच्या या प्रकरणाची नोंद शहराला वीज पुरवठा करणाऱ्या बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या कंपनीने घेतली होती.
 
तोपर्यंत मुंबई महानगर, पश्चिम आणि मध्य उपनगरं त्याचबरोबर ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी या शहरांपर्यंत वीज पुरवठा खंडित झालेला होता आणि त्याचा फटका उपनगरी रेल्वेसेवा, शहरातील अत्यावश्यक सेवा, रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेलाही बसला होता.
 
पुढच्या दोन तासांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आलं. पण, मुंबईसारख्या औद्योगिक राजधानीत घडलेल्या या प्रकारामुळे काही तास सगळ्याच यंत्रणेचा गोंधळ उडाला होता.
 
महापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट-1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-2 वर होता. मात्र सर्किट-2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती.
 
कोरोना काळात वीजपुरवठा बंद झाल्यामुळे हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण आला होता. लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते.
 
मुंबईला वीज पुरवठा कोण करतं?
मुंबई ही औद्योगिक राजधानी असल्यामुळे इथली विजेची औद्योगिक मागणीही मोठी आहे. त्यासाठीच 1873 साली मुंबईत बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली.
 
मुंबईला अखंड विद्युत पुरवठा करणं आणि शहराअंतर्गत वाहतूक सेवा चालवणं हे तिचं मुख्य काम होतं. आताही शहरातील साडे दहा लाख घर आणि कार्यालयांना हीच कंपनी वीज पुरवठा करते.
 
पण, मुंबई शहर जसं विस्तारलं आणि उपनगरांची वाढ होत गेली तेव्हा विजेच्या वाढत्या मागणीसाठी सरकारी बरोबरच खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा वाढवण्याची गरज निर्माण झाली.
 
त्यातूनच 1990च्या दशकापासून मुंबई शहर आणि उपनगरांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर, रिलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आले. यातील रिलायन्स कंपनीने आपला मुंबई शहराला करत असलेला वीज पुरवठा अलीकडेच म्हणजे 2018 मध्ये अदानी पॉवर या कंपनीला विकला आहे.
 
थोडक्यात म्हणजे या घडीला दक्षिण मुंबईत बेस्ट, पश्चिम आणि मध्य मुंबईत टाटा तसंच अदानी पॉवर या कंपन्यांकडून पुरवठा होतो. टाटा पॉवर कंपनी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती करते जिचा पुरवठा ग्राहकांना आणि खासकरून शहरातली व्यापारी संकुल, कार्यालयं यांना होतो.
 
तर अदानी एनर्जी ही कंपनी मुंबई जवळ डहाणू इथं पाचशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करते आणि तिचा पुरवठा घरगुती ग्राहकांना आणि व्यापारी कामांसाठीही होतो.
 
अशा पद्धतीने मुंबई शहराची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतो.
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती