ममता बॅनर्जी : 'भारतात चार राजधान्या हव्यात, कोलकात्यातून इंग्रज देशावर राज्य करत'

शनिवार, 23 जानेवारी 2021 (15:56 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतात चार राजधान्यांची आवश्यकता व्यक्त केली असून, त्यात पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यालाही स्थान देण्याची मागणी केलीय.
 
ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मला वाटतं की, भारताला चार राजधान्या हव्यात. इंग्रजांनी कोलकात्यातून संपूर्ण देशावर सत्ता गाजवली. देशात केवळ एकच राजधानी का असावी?"
सुभाषचंद्र बोस यांचा आज जन्मदिन आहे. हे निमित्त साधत तृणमूल काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी पश्चिम बंगालमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या सर्व कार्यक्रमांना काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमीही आहे.
 
अशाच एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी देशाला चार राजधान्यांची गरज व्यक्त केली.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, "नेताजींनी जेव्हा आझाद हिंद सेनेची स्थापना केली, तेव्हा गुजरात, बंगाल, तामिळनाडू अशा सर्व ठिकाणच्या लोकांना त्यात स्थान दिलं. 'तोडा आणि राज्य करा' या ब्रिटिशांच्या नियमाविरोधात ते उभे राहिले."
"आजचा दिवस 'देशनायक' दिवस आहे. रवींद्रनाथ टागोरांनी नेताजींना 'देशनायक' म्हटलं होतं," असंही त्या म्हणाल्या.
 
यावेळी ममता बॅनर्जी यांनी आझाद हिंद सेनेचा पुतळा उभारण्याची घोषणा केली.
 
ममता बॅनर्जी या सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जन्मदिनाचे औचित्य साधत कोलकात्यातील श्याम बाजार ते रेड रोड या मार्गावर पायी चालल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती