हाथरस : उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटलं जातं आणि तिथं आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो - संजय राऊत

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (15:25 IST)
उत्तर प्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. तिथं हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, असा मत क्शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
 
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्काराच्या घटनेवर ते बोलत होते.
 
या देशात एकेकाळी खंबीरपणे लढणारी दलित चळवळ निस्तेज होताना दिसत आहे, एका दलित मुलीवर अत्याचार, बलात्कार होतो आणि कोणीही उसळून उठत नाही, असंही ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशाला रामराज्य म्हटलं जातं. तिथे राम मंदिरची उभारणी होत आहे. तिथे हाथरससारख्या जिल्ह्यात मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. एरव्ही महाराष्ट्र, पश्चिम बंगाल किंवा दुसरीकडे अशी घटना घडली, कोणाच्या घराची कौलं जरी उडवली, एखाद्या नटीवर अन्याय, अत्याचार झाला म्हणून आंदोलन चालवतात ते आज कुठे आहेत? तो मीडिया कुठे आहे? एका गरीब मुलीला न्याय मिळू नये का? न्याय मागण्यासाठी एखादी नटी, अभिनेत्री सेलिब्रेटीच हवी आहे का?
 
"हाथरसमधील मुलगी आपली कोणी लागत नाही का? तीसुद्धा आपलीच आहे. रामदास आठवले जे नटीच्या घरी जाऊन सुरक्षा देत होते, नटीच्या स्वागतासाठी विमानतळावर कार्यकर्ते गेले ते कुठे आहेत?" असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती