Exit Poll LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस, मुंडे, पवार, ठाकरे यांचं काय होणार?

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (17:11 IST)
मतदान संपलं रे संपलं की तुमच्या अवतीभवती एक शब्द ऐकायला मिळतो - एक्झिट पोल.
संध्याकाळी सहा वाजता राज्यभरातली मतदान संपताच तुम्ही इथेच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल पाहू शकाल.
 
पण जर तुम्हालाही कदाचित हा प्रश्न पडला असेल की 'काय असतात एक्झिट पोल?' तर पुढे वाचा.
 
Exit poll, म्हणजे जेव्हा लोक मतदान केंद्रांमधून exit करतात, बाहेर पडतात तेव्हा त्यांनी कुणाला मत दिलं, हे जाणून घेण्यासाठी वेगवेगळे सर्व्हे केले जातात.
 
Centre for the Study of Developing Societiesचे संचालक संजय कुमार सांगतात की "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं, ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे, त्या राज्यातलेच हे मतदार या सँपलमध्ये असतात. लोकसंख्येत एखाद्या समुदायाचं जे प्रमाण असतं, तितकंच त्यांचं प्रमाण या सँपलमध्ये असतं. म्हणजे ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."
 
"या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो," असं ते म्हणाले.
एक्झिट पोल किती अचूक?
बीबीसीनं 2014 ते 2018 या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलचा अभ्यास केला. त्यातून असं लक्षात आलं की एक्झिट पोलमुळे आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो, पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील, हे नेमकं समजू शकत नाही.
 
याचं उदाहरण म्हणून आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीकडे एक नजर टाकूया.
 
C-Voter या पोलिंग एजंसीचा अंदाज होता की भाजप आणि मित्रपक्ष 287 जागा जिंकेल, तर काँग्रेसच्या UPAला 128 जागा येतील. तर टुडे'ज चाणक्यनं म्हटलं होतं की भाजपच्या NDAला 350 जागा मिळतील आणि UPAला 95 जागा मिळतील. इतरांना 97.
 
याव्यतिरिक्त VMR, Axis My India, Jan Ki Baat, Nielson, Poll Diary अशा सर्वच सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांचा हाच अंदाज होता की भाजप आणि मित्रपक्षांना 265 ते 365 जागा मिळतील. मात्र 23 मेला निकाल लागला तेव्हा NDAला 353 जागा मिळाल्या होत्या.
 
हा फरक कसा राहतो, याचं उत्तर CSDSचे संचालक संजय कुमार देतात, "एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचा अंदाज बांधला जातो."
 
उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला 25 टक्के मतं मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं. "पण कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये फरक दिसून येतो. खरं तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, मात्र संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते. यालाच first-past-the-post असं म्हणतात," ते पुढे सांगतात.
 
त्यामुळेच कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38.14 टक्के मतं मिळूनही त्यांच्या 80 जागा आल्या तर भाजपला 36.3 टक्के, म्हणजे दोन टक्के कमी मतं मिळूनही 104 जागा मिळाल्या.
 
मग प्रत्येक संस्थेचे पोल वेगवेगळे का असतात?
राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सांगतात की, "एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील, हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असतं. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असलं, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असं नाहीये.
 
"यात काही चूक नाहीये. म्हणजे एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करूनसुद्धा त्याच्यामध्ये जागा किती मिळतील, याबाबत अनिश्चितता असू शकते. ते नॅचरल आहे. जशी अमेरिकेत आहे, त्या अध्यक्षीय निवडणूक पद्धतीत, अध्यक्ष कोण निवडून येईल, असं फक्त सांगायचं असतं. तसं आपल्याकडे नाहीये. 543 मतदारसंघ असतात, त्यामुळे संसदीय पद्धतीत सीट सांगणं कठीण असतं."
 
पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
 
CSDSचे संजय कुमार ते सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही."
 
"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."
 
Psephologist आणि C-voterचे संस्थापक यशवंत देशमुख सांगतात, "कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील, एवढं सांगायचं काम फक्त एक्झिट पोल करत असतो."
 
मग एक्झिट पोल किती खरे, किती खोटे?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'The Verdict: Decoding India's Election' या पुस्तकात मिळतं. या पुस्तकात 1980 ते 2018 दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत. त्यात ते सांगतात की एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे.
मग एक्झिट पोल्सना इतकं महत्त्व का?
तर थांबा, निवडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं. यशवंत देशमुख यांच्या मते, "कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, हे सांगणं एक्झिट पोलचं पहिलं काम असतं. दुसरं म्हणजे प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तो निकाल एक्झिट पोलशी कम्पेअर केला जातो, यातून मग डेमोग्राफिक्स कळतं, म्हणजे महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी कुणाला मतं दिली, याचा अंदाज व्यक्त करता येतो.
 
कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती