आज बाळासाहेब असायला हवे होते त्यांना खूप आनंद झाला असता

शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (16:29 IST)
अयोध्या मंदिरबाबत सुप्रीम कोर्टाच्या  निकालानंतर राज ठाकरे  यांनी माध्यमांना पुणे येथे प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असून, ते म्हणाले की “आज अतिशय आनंद झाला. इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती ती आज संपली असं म्हणायला हरकत नाही. या संपूर्ण आंदोलनात, संघर्षात ज्या कारसेवकांनी बलिदान दिलं, ते कुठेतरी सार्थकी लागलं असं म्हणावं लागेल. राम मंदिर लवकरात लवकर बांधावं. त्याशिवाय देशात रामराज्यही आणावं, जेणेकरुन आज ज्या देशात नोकऱ्या जातायेत, इतर काही गोष्टी घडतायत, ते संपावं. आजच्या निर्णयानंतर मला मनापासून काही वाटत असेल तर, आज बाळासाहेब असायला हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते, त्यांना खूप आनंद झाला असता. सर्वोच्च न्यायालयाचं मी मनापासून आभार मानेन, अभिनंदन करेन, इतका धाडसी निर्णय घेतला.”
 
राज ठाकरे यांनी मराठीत प्रतिक्रिया दिली त्यानंतर त्यांना  हिंदी माध्यमांनी हिंदी भाषेत  प्रतिक्रिया द्या असे सुचवले तेव्हा  राज ठाकरेंनी टोमणे मारत, माझं हिंदी इतकं चांगलं नाही, असं म्हटले आहे. तर जाता जाता राज ठाकरेंनी सार्थकी लागणे याला हिंदीत काय म्हणतात, हे सुद्धा उपस्थित पत्रकारांना विचारलं आणि सर्वजण विचार करा, असा सल्ला दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती